शेतकर्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. अशातच येथील स्थानिक, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली गेलेली नाही. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकर्यांनी जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बेणसे सिद्धार्थ नगर येथील प्रकल्पबाधित शेतकरी योगेश अडसुळे यांच्यासह परिसरातील शेतकर्यांनी रिलायन्सविरोधात जिल्हाधिकार्यांना तक्रारी निवेदन दिले असून, आमरण उपोषणाचा इशारा देत दंड थोपटले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
सदर तक्रारी निवेदनात म्हटले आहे की आमची वडिलोपार्जित जमीन मिळकत तत्कालीन इंडियन पेट्रोकेमिकल्स या सरकारी कारखान्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत खरेदी करण्याकामी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता तसेच आम्हाला सदर जमिनीचा कोणताही मोबदला न देता परस्पर सदर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने करून फसवणूक केली असल्याची तक्रार अडसुळे यांनी केली आहे. आता रिलायन्स नागोठणे कंपनीकडून शेतजमिनीत पेट्रोलियम कायदा 1962 चे उल्लंघन करून पाईपलाईन टाकण्याकामी उल्लंघन केले आहे. त्यामुळे सदरचे काम थांबवून मला न्याय मिळावा यासाठी दि.11 डिसेंबरपासून योगेश अडसुळे आपल्या कुटुंबियांसह बेणसे बौद्धवाडी येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. यासंबंधीचे पत्र माहितीकरिता रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग, प्रांताधिकारी पेण, पोलीस निरीक्षक नागोठणे आदींना देण्यात आले आहे.
सदर प्रकल्प उभारत असताना धक्कादायक म्हणजे यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेण्यात आली नाही तसेच स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, नागरिकांच्या, एकाही समस्येचे निराकरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या कडे करूनही प्रशासनाने एकही बैठक लावली नसल्याने स्थानिकांतून असंतोषाची भावना उफाळून आली आहे. केवळ पोलीस बळाचा वापर, जनमताच्या विरोधात 30 फुटी आवाढव्य भिंत बांधून गावाला कोंड वाड्याप्रमाणे वेठीस धरले जात असल्याचा संताप बेणसे झोतिरपाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा बौध्दजन समाजसेवा संघ बेणसे सिद्धार्थ नगर चे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात बेणसे झोतिरपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने व बेणसे सिद्धार्थ नगर ग्रामस्थांनी व्यापक स्वरूपाची लढाऊ आणि आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. अशातच केवळ बेणसे बौद्धवाडीला सर्वाधिक टार्गेट केले जात असेल तर भविष्यात याविरोधात तीव्र आंदोलन पेटल, अशी परिस्थिती सद्यःस्थितीत निर्माण झाली आहे. बेणसे सिद्धार्थ नगर येथील स्मशानभूमीजवळ रिलायन्स नागोठणे कंपनीने नवीन वसाहतीच्या बांधकाम करताना खोदकामात निघालेली माती बेणसे बौद्धवाडीच्या मागील बाजूस भराव केल्याने वहिवाटीचा रस्ता बंद झालेला आहे. अशातच गावालगत 30 फुटी मोठी भिंत बांधली तर भविष्यात कोणतेही संकट आपत्ती आली तर किमान रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचा बंब जाईल येईल इतका रस्तादेखील सोडला जात नाही, आम्हाला आपत्तीत बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नसल्याचे बबन अडसुळे व ग्रामस्थांनी म्हटले आहे. तसेच येथील स्मशानभूमीचे काय करणार याबाबत कोणतीही भूमिका गावकर्यांसमोर ठेवली नसल्याने बौद्ध समाज बांधवात संभ्रम आहे. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.







