कदम, चव्हाण यांच्यात जुंपली

मुंबई-गोवा महामार्गावरून युतीत खोडा?

| ठाणे । वृत्तसंस्था ।

प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला; पण मुंबई-गोवा महामार्ग 14 वर्षांत झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणार्‍या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवा असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री चव्हाण यांना घरचा आहेर दिला. ही टीका मंत्री चव्हाण यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी युतीधर्म पाळतो याचा अर्थ असा नाही कोणी काही बोलेल. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला. यामुळे युतीत आता कुस्ती पहायला मिळणार का अशी चर्चा होऊ लागली आहे.

ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी उद्धव ठाकरेंपासून ते भाजप नेत्यांपर्यंत अनेकांचा त्यांनी समाचार घेतला.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला; पण मुंबई-गोवा महामार्ग 14 वर्षांत झाला नाही. याचे दुःख वाटत आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणार्‍या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असे म्हणत महायुतीला घरचा आहेर दिला.

शिंदे गटाच्या या टीकेला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खरंमरीत उत्तर दिले आहे, या संदर्भातला प्रश्‍न तो अडाणी माणूस आहे हे माझं मत. नॅशनल हायवे नितीन गडकरी यांच्या अंतर्गत येतो त्यामुळे हे अडाण्यासारखे त्यांचे उत्तर आहे. मला त्यांच्यावर टीका करायला आवडत नाही मात्र त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले. त्यांच्या मुलाला हजारो कोटी रुपये निधी दिले. त्यामुळे त्यांनी माझे आभार मानले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. पंधरा वर्षे मंत्री होते. तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय केले. मला बोलायला खूप काही येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं त्यावेळेला कोणी वाचवायला राहणार नाही. हे लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे. रवी चव्हाण युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही कोणीही काही बोले आणि आम्ही ऐकून घेणार नाही हे लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे खरमरीत उत्तर चव्हाण यांनी दिले. दरम्यान मुंबई-गोव्याच्या रस्त्यावर महायुतीमधील दोन घटक पक्षात मात्र आता मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version