बेरोजगारीमुळे रायगडातील अनेक तरूणांसह कुटुंबांची शहराकडे धाव
| कोपोली | वार्ताहर |
रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातीलच नव्हे तर, अनेक तालुक्यांमधील कुटुंबं आणि बेरोजगार तरुण मुंबईला नोकरीच्या शोधात गेले आहेत. रोजगार नसल्याने आपले मूळ गाव सोडून आईवडिलांसह मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाने थैमान घातले होते, हाताला काम नसल्याने अनेक लोकं घरातच बसून होते. आधीच महागाईच्या ओझ्याखाली लोकं दबून गेली होती. खिशात पैसे नसल्याने अनेक लोकांचे अक्षरशः हाल होत होते. जे काही पैसे जमा होते ते लॉकडाउनच्या काळात खर्च करून संपून गेले, असे लोकं आपल्या भावनेतून बोलुन दाखवतात. आता जरी कोव्हिड नसला तरी लोकांना काम धंदा नसल्याने उपासमार होऊ लागली आहे.
आज कडधान्ये, घरगुती सिलिंडर, डिझेल, पेट्रोल दरवाढ भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे अर्थातच त्याचा परिणाम खाद्य पदार्थावर पडला. मुलांना शिक्षण देणे परवडत नसल्याने मुलांसह कुटुंब मुंबईला गेले आहेत. गावच्या गाव खाली व्हायला लागली तर गावाचं गावपण आता उरणार नाही, असे जुनी लोकं बोलून दाखवत आहेत. शासनाने आता तरी डोळे उघडावे आणि ग्रामीण भागात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा तरच खेडी टिकतील, नाहीतर सणासुदीलाच गावे भरलेली दिसतील.
आज अनेक गावात पहायला गेलो तर घराचे दरवाजे बंद अवस्थेत आहेत. कधी नव्हे असे विदारक चित्र पहायला मिळत आहे. काही गावात तर वृद्ध लोकच नजरेस पडत आहेत. मोजकेच लोकं उरली आहेत. काही गावात जर एखादी म्हातारी व्यक्ती आजारी पडली तर तरुण मुलंदेखील दवाखान्यात उचलून न्यायला नाहीत. अनेक गावांमध्ये मराठी शाळा, अंगणवाड्या बंद पडल्या आहेत. वृद्धांशिवाय गावात एक मुलही दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
मोठ मोठे उद्योग धंदे उभारावेत
राजकारण आता तरी थांबवावे आणि शासनानेही ठोस पावले उचलून मोठ मोठे उद्योग धंदे प्रत्येक तालुक्यात प्रयत्न करून आणावेत, अशी मागणी तरुण मुलांकडूनच नाही तर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून होऊ लागली आहे. अन्यथा उरली सुरली कुटुंबंदेखील गाव सोडून शहराकडे वळतील अशी परिस्थिती निर्माण होईल. उद्योगमंत्र्यांनी याची जाणीव ठेवून कोकणातील तरुणांना उभारी देण्यासाठी दौरे करावेत, अन्यथा खेडी ओस झालेली दिसतील.