मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

। पनवेल । प्रतिनिधी ।
नाईलाज म्हणून एकनाथ शिंदेंना मनावर दगड ठेवत मुख्यमंत्री केलं, असा पुनरुच्चार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. रुसून न बसता केंद्रातल्या नेत्यांचा आदेश आपण ऐकल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत पाटील बोलत होते.

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.

नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे. आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ.नेत्यांनी आदेश करायचा नसतो. इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचं असतं, असं आवाहनही यावेळी चंद्रकांत पाटलांनी उपस्थित नेत्यांना केलं आहे.

Exit mobile version