। पेण । वार्ताहर ।
पेण नगरपालिकेकडून भाजी मार्केटच्या मूळ गाळेधारकांना चुकीच्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असून, वारंवार धमकीवजा नोटीस देऊन गाळेधारकांना त्रास दिला जात आहे. नगरपालिका प्रशासन कुणाच्या सांगण्यावरुन जर गाळेधारकांना जागा खाली करण्यास भाग पाडत असतील, तर शेकाप ते कधीच मान्य करणार नाही. माजी आ. धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरुन लढाई लढू, असा इशारा शेकाप नगरसेवक शोमेर पेणकर यांनी दिला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, 10 नोव्हेंबर 2021 च्या जनरल सभेमध्ये भाजी मार्केटच्या गाळेधारकांचा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी नगरसेवक शोमेर पेणकर यांनी सभागृहाचे लक्ष केंद्रित केले होते, की गाळेधारकांना नवीन इमारतीसमोरील पत्र्याचे गाळे मोडून आठ दिवसांच्या आत जागा खाली करून द्यायची आहे. त्यावेळी सभागृहात पूर्ण चर्चेनशी एकमताने असे ठरवण्यात आले, की मूळचे जुने गाळेधारक आहेत, त्यांना गाळे दिल्यानंतरच इतर गाळ्यांचे लिलाव करण्यात येतील. त्यावर नगरसेवक संतोष पाटील यांनी सांगितले होते की, तुमच्या समितीचे आवाहल येइपर्यंत तुम्ही थांबू नका. जे काही 11 किंवा 15 गाळेधारक आहेत, त्यांना जागा उपलब्ध करून द्या व त्यांच्यासाठी प्राधान्य क्रमांक पहिला देऊन जी रक्कम भरून घ्यायची आहे ती घ्या. परंतु, आजच्या स्थितीला गाळेधारकांना त्रास देऊ नये. त्यानंतर पूर्ण सभागृहात ठराव सहमत झाले असतानादेखील नगरपालिका प्रशासन कुणाच्या सांगण्यावरुन जर गाळेधारकांना जागा खाली करण्यास भाग पाडत असतील, तर शेकाप ते कधीच मान्य करणार नाही.
पुढे त्यांनी असेही सांगितले की, जेव्हा नगरपालिकेला भाजी मार्केट बांधण्यासाठी जागेची आवश्यकता होती, तेव्हा याच गाळेधारकांना गोड बोलून बाजूला सरकवले. तसेच नगरपालिकेने स्वखर्चात पत्र्याचे गाळे काढून दिले. जर गाळेधारकांचा हक्क नसता, तर नगरपालिकेने स्वतःचे पैसे खर्च करून गाळे बांधून दिले असते का? मात्र, आज इमारत होताच नगरपालिका प्रशासन गाळेधारकांवर उलटली आहे. एकंदरीत काय, तर गरज सरो आणि वैद्य मरो अशाच प्रकारचा पवित्रा जणू काही नगरपालिकेने घेतला आहे. मात्र, या नगरपालिकेच्या दडपशाही पद्धतीला शेकाप जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि कुणी राजकीय मंडळी प्रशासनाला आपल्या म्हणण्या नुसार वागायला सांगून जर मुळ जुन्या गाळेधारकांना त्रास देत असेल तर त्या मंडळीना ही योग्य तो उत्तर दिला जाईल यात काही शंका नाही. शेतकरी कामगार पक्ष हा खंबीरपणे गाळेधारकांच्या सोबत आहे, असे शेवटी शोमेर पेणकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.