हवाई वाहतूक मंत्र्यांनी माफी मागावी: खा. वर्षा गायकवाड

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| मुंबई | प्रतिनिधी |

सर्वसामान्य माणसांनाही हवाई प्रवास सुलभ करण्याचे नरेंद्र मोदींनी दाखवलेले स्वप्न हे केवळ दिवास्वप्नच राहिले असून, हवाई प्रवास हा शोषण व लुटीचे साधन बनला आहे. मागील सहा-सात दिवसांत इंडिगोने जो गोंधळ घातला त्यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.
यावेळी कोणीही प्रवाशांशी संवाद साधला नाही. या गोंधळामुळे भारताची जगात नाच्चकी झाली, हे सर्व एकाच विमान कंपनीच्या मक्तेदारीमुळे झाले असून झालेल्या प्रकाराबद्दल सरकार व विमान वाहतूक मंत्री यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, देशात आधी किंग फिशर, जेट एअरवेज, गो फर्स्ट, एअर डेक्कन, जेटलाईट, एअर सहारा, एअर एशिया इंडिया कंपन्या हवाई क्षेत्रात सेवा देत होत्या; सरकारकडे ठोस धोरण नसल्याने यातील एक एक कपनी बंद होत जवळपास 20 विमान वाहतूक कंपन्या बंद पडल्या. आता फक्त एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो अशा काही मोजक्या कंपन्यांच कार्यरत आहेत. परंतु, यातील सर्वात मोठा हिस्सा हा इंडिगो या एकाच कंपनीकडे आहे आणि या कंपनीच्या मक्तेदारीमुळे परवाचा गोंधळ झाला. मक्तेदारी असल्याने ग्राहकांचे शोषण व लुट सुरु आहे. 5 ते 6 हजार रुपयांचे तिकिट 20 ते 30 हजार रुपये झाले. विमानतळावर लोकांना पाणीसुद्धा मिळाले नाही. अडकलेल्या प्रवाशांशी कोणीही संवाद साधला नाही. आता नवी मुंबई विमान तळावरून इंडिगो कंपनीला परवानगी दिली आहे. परंतु, नुकताच झालेला बट्ट्याबोळ पाहता सरकारकडे प्लॅन बी आहे का, असा प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

विविध शुल्कांच्या नावाखाली लुट
विमानतळावर प्रवाशांकडून व इंधन सरचार्जच्या नावाखाली मोठी लुट केली जात आहे. पार्किंग चार्जेस एका तासाला 370 दोन तासाला 400 रुपये तर सहा तासाला 1 हजार रुपये आकारले जाते. मुंबई विमानतळावरील दुकानदारांकडून अदानी कंपनी भरमसाठ भाडे आकारते व विक्रीतूनही मोठा हिस्सा वसूल करते, अशी दुहेरी लुट सुरु आहे. अदानी कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 175 रुपये असलेला शुल्क 3,856 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे, त्याला रोखण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसत नाही. अदानी कंपनीची मनमानी सरकार खपवून घेत असून मुंबईचा हवाई प्रवास महाग करण्याचा हा प्रकार आहे. ही लुट पाहता एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाचे नाव बदलून अदानी अँड सन्स हे नाव ठेवले पाहिजे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Exit mobile version