। अलिबाग । वार्ताहर ।
प्रत्येकासाठी न्याय ही संकल्पना असलेले राष्ट्रीय न्याय सेवा प्राधिकरण व सर्वसामान्य गरीब जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचविणारे पोस्ट ऑफिस यांच्या समन्वयाने महिला, मुले, गरीब, दुर्बल वर्गातील व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत व सल्ला मिळण्याचा हक्क आहे. याबाबतची माहिती ग्रामीण जनतेला करून देण्यासाठी तसेच याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रातिनिधीक कार्यक्रम म्हणून सनबोर्डाचे अनावरण करून अलिबाग मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये डाक अधीक्षक रायगड विभाग अविनाश पाखरे यांच्या हस्ते पार पडला.
याचा मुख्य उद्देश महिला व 18 वर्षापर्यंतची मुले, अनुसूचित जाती व जमाती वर्ग, विविध प्रकारची आपत्त्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप पीडित व्यक्ती, मानवी तस्करी शोषण किवा वेठबिगारीचे बळी, तुरुंगात असलेल्या व्यक्ती, औद्योगिक कामगार, मानसिकदृष्ट्या दुर्बल किवां दिव्यांग व्यक्ती, वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असलेल्या सामान्य व्यक्ती यांना विनामूल्य सरकारी वकील, कायदेशीर सल्ला, खटल्यासाठी लागणारा प्रासंगिक खर्च इत्यादी बाबींची सरकारकडून मोफत मदत केली जाते. ही माहिती पोस्ट ऑफिसमुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल, असा विश्वास या कार्यक्रमाचे रायगड जिल्ह्यात नियोजन करणारे रायगड जिल्हा सेवा प्राधिकरणचे श्री. स्वामी यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमालागजेंद्र भूसाणे, शिवाजी कोठेवाड, समीर म्हात्रे,रवी केंदे, सुग्रीव टोगरे, लक्ष्मण शेवाळे, सुरेश धुर्डे, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.