आजादी का अमृत महोत्सव

महावितरणतर्फे उज्वल भारत-उज्वल भविष्य महोत्सव
| मुंबई | प्रतिनिधी |

आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य-पॉवर 2047 हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या सहकार्याने 25 ते 30 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर आयोजित या कार्यक्रमात देशातील 773 जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. या महोत्सवाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध विद्युत योजनाच्या माध्यमातून गावपाड्यात, शेतात ऊर्जीकरण झालेल्या लाभार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून 30 जुलै रोजी महाराष्ट्रातील नाशिक, वर्धा, कोल्हापूर, नंदूरबार आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यात लाभार्थ्यांसह देशभरातील दहा ठिकाणी व्ही.सी.द्वारे कार्यक्रम घेण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यासमवेत संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील कमीत कमी एका लाभार्थ्यासोबत मा. पंतप्रधान संवाद साधतील असा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी सध्या ऊर्जाप्रेरित झालेली गावे, स्वातंत्र्य सैनिकांची गावे किंवा ऐतिहासिक अशा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनोजकुमार श्रीवास्तव यांनी नुकतीच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांना या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना संदर्भात व्ही.सी. द्वारे मार्गदर्शन केले. या महोत्सवच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर नोडल ऑफिसर म्हणून महावितरणचे अधिक्षक अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहकार्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागाच्या अधिकार्‍यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version