चरीचा शेतकरी संप
। अलिबाग । उमाजी केळुसकर ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी पडली. ही ठिणगी विषमतेविरुद्ध होती. समतेची, न्याय्य हक्कांची होती. चरीच्या शेतकरी संपाची प्रेरणा या घटनेत दडलेली आहे. चरी गावाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आणि शेतकरी-कामगारांचे नेते नारायण नागू पाटील यांच्या धारदार नेतृत्वाला अधिकच झळाली आली. संपकरी शेतकर्यांच्या दृढ निश्चयाला जणू वज्रकवच मिळाले. शेतकर्यांचा चरी येथील जगातील एकमेव प्रदीर्घ संप यशस्वी ठरला. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेेरणा, आशीर्वाद आणि मार्गदर्शनही कारणीभूत आहे. सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला घटनात्मक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती 14 एप्रिल रोजी आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम पाय पडले ते 16 डिसेंबर 1934 साली रेवस धक्क्यावर. (नंतर अनेकदा ते धरमतर धक्क्यावरुन पोयनाड मार्गे आले. तेव्हा धरमतर पूल नव्हता) भाऊच्या धक्क्यावरुन समुद्रमार्गे बोटीने त्यांना भाई अनंतराव चित्रे घेऊन आले होते. निमित्त होते शेतकरी संपानिमित्त आयोजित केलेल्या चरी येथील कुलाबा जिल्हा शेतकरी परिषदेचे. या परिषदेचे संघटक शेतकरी संपाचे नेते नारायण नागू पाटील होते. या परिषदेचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर 43 वर्षांचे होते आणि नारायण नागू पाटील यांचे वय होते 42 वर्षे. एक वर्षांनी लहान असलेले नारायण नागू पाटील हाडाचे शिक्षक होते, आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षवेधक ठरली होती. अनेक शेतकरी चळवळीत सहभाग घेतला होता, नेतृत्वही केले होते. या नेतृत्वाला चरीच्या शेतकरी संपाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाठबळ मिळत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खारेपाटात येणार म्हणून येथील बहुजनांना प्रचंड आनंद झाला होता. त्यामुळे रेवस धक्क्यापासून सारळ, हाशिवरे, नारंगी, वाटेत जी-जी गावे आहेत, तेथे तेथे शेतकरी-कष्टकर्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हार-तुरे देऊन मोठ्या उत्साहाने स्वागत केले. त्यांना भाई अनंतराव चित्रे पेझारी येथे घेऊन आले. पेझारी नाक्यावर एका घरात तात्पुरते भाड्याने राहणार्या नारायण नागू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तेथील पाहुणचार स्वीकारल्यानंतर ते जायला निघाले. तेव्हा पेझारी येथे सुमारे 2 हजार शेतकरी जमले आणि त्यांनी त्यांची नारायण नागू पाटलांसह भव्य मिरवणूक काढली. ही मिरवणूक चरी गावातही फिरली आणि सभास्थानी आली. सभास्थान शेतकरी, कष्टकर्यांनी खचाखच भरलेले पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतकरी संप कोणत्या निर्धाराने लढवला जातोय हे लक्षात आले. समोर बसलेल्या दुबळ्या अंगकाठीच्या शेतकर्यांमध्ये इच्छाशक्तीचे कठीण कवच असल्याचे त्यांनी हेरले. त्यांनी शेतकरी-कामगारांचे नेते नारायण नागू पाटील यांना म्हटले, ‘तुमचा एक एक शेतकरी असा आहे, की एका शेतकर्याला या भूमीत पेरले, तर त्याचे लाख शेतकरी या भूमीतून निर्माण होतील!’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे उद्गार ऐकून नारायण नागू पाटलांना आपल्या संपकरी शेतकर्यांचा अभिमान वाटला. समोरचे शेतकरी घोषणा देत होते, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय! चरी शेतकरी संपाचा विजय असो!’ या शेतकर्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला कारणही तसेच होते. या परिषदेच्या दोन दिवस अगोदर कोकणातील खोती-सावकारीविरुद्धच्या लढ्यातील नेते भाई अनंतराव चित्रे, सुरबाबानाना टिपणीस, श्यामराव परुळेकर हे चरीला आले होते. परिषदेची जय्यत तयारी झाली होती, परंतु तेथील सावकारांचा परिषदेचा फज्जा उडविण्याचा डाव होता. त्यांनी परिषदेच्या आदल्या दिवशी अफवा पसरविली की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेसाठी येणार नाहीत. संपकरी शेतकरी हिरमुसले. तेव्हा भाई अनंतराव चित्रे हे तातडीने स्वत: मुंबईस गेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेला येणार आहेत’ अशी तार रात्री 10 वाजता चरीला आली आणि शेतकर्यांसह सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यासमोर आणि आपल्यासमवेत पाहून शेतकरी-कष्टकर्यांना आपल्या संपाचं चीज झाल्याचं वाटत होतं.
या चरीच्या शेतकरी परिषदेच्या वेळी दोन्ही दिवस अस्पृश्य आणि स्पृश्यांच्या जेवणाच्या पंगती एकत्रच उठत होत्या. त्यामुळे उच्चवर्णीय सावकारांनी ‘नारायण नागू पाटील आगरी जात बाटवत आहेत’ अशी आवईही उठवली. पण त्यांच्या कोल्हेकुईकडे कोणी लक्ष दिले नाही. सहभोजन-सहवावराने अस्पृश्यतेचे सनातनी भूत या भूमीत गाडण्यात आले. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. आपल्या न्याय्य हक्कांबरोबरच सामाजिक समतेचाही जागर या परिषदेतून झाला. उक्ती आणि कृतीचा तेथे संगम पहायला मिळाला. डॉ. बाबासाहेबांचा वावरच पवित्र-अपवित्र या संकल्पनांना धक्का देणारा होता. त्याचे प्रतिबिंब तेथील स्पृश्य-अस्पृश्यांमध्ये उमटले होते. माणूस म्हणून ही मंडळी शेतकरी संपात वावरली आणि प्रतिकूल परिस्थितीतही सावकारशाहीविरुद्ध त्यांची एकजूट राहिली. आपल्याला जशी माणसे हवी आहेत, तशी माणसे येथे घडत असल्याचे पाहून त्यांना आनंद वाटला. ते नारायण नागू पाटील यांना म्हणाले, ‘आप्पा, तुमचा शेतकरी-कामगार सुधारणावादी आहे. त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज होती. तुमच्या रुपाने ते मिळतेय. तुमचा संप यशस्वी होईलच, पण या संपाच्या निमित्ताने या जिल्ह्यातूनही अस्पृश्यतेचा पगडा नाहीसा होईल असे मला वाटतेय.’
शेतकरी संपाची पार्श्वभूमी
अलिबाग-पेण रस्त्यावर पळीनजिक चरी हे गाव आहे. सावकारांची शेती कसायची आणि त्यातून जे काही मिळेल त्यावर वर्षभर कुटुंबाची उपजीविका करायची अशी चरी आणि सभोवतालच्या गावातील वर्षानुवर्षे रित होती. जमिनीमध्ये भात आणि अन्नधान्य पिकवून 75 टक्के माल सावकारांना द्यायचा शिवाय पेंढापाण्याच्या रूपानंही काही उत्पन्न शेतकर्यांना द्यावं लागायचं. म्हणजे वर्षभर शेतीत काबाडकष्ट करुनही शेतकर्यांच्या हाती काहीच उरायचं नाही. त्यामुळं वर्षातले अनेक दिवस कुळांना उपाशीपोटीच जीवन जगावं लागायचं. हे चरीच्या परिसरातच घडत होतं असं नाही. सार्या कोकणातच खोत, जमीनदार, सावकारांकडून कुळांवर अन्याय होत होते. त्याविरुद्ध कुळांमध्ये मोठा असंतोष होता. संताप होता. या संतापातून 1905 मध्ये पेण तालुक्यातील वढाव गावातील शेतकर्यांनी पहिला संप केला. या संपाचे फलित असे होते की, 1927 मध्ये ‘कोकण प्रांत शेतकरी संघाची’ स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून कोकण प्रांतातील आगरी, कोळी, कराडी, कुणबी, मराठा, तेली, माळी, भंडारी, आदिवासी व अस्पृश्यांना एकत्र करीत त्यांची मोट बांधण्याचे काम करण्यात आलेे. त्यांच्यात खोती-सावकारी पद्धतीविरोधात वन्ही पेटवण्याला. त्यानंतर पेण येथे 25 डिसेंबर 1930 मध्ये पहिली कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद भरवण्यात आली. याचा परिणाम असा झाला की, नारायण नागू पाटील यांच्यावर भाषणबंदी लादली गेली. भाषणबंदी संपताच नारायण नागू पाटील आणि अनंतराव चित्रे यांनी 27 ऑक्टोबर 1933 रोजी चरी परिसरातील पंचवीस गावातील शेतकर्यांची सभा चरी इथं लावली. सरकारधार्जिण्या, खोत-सावकार-जमीनदार धार्जिण्या वृत्तपत्रांनी शेतकरी संपाविरोधात बातम्या देण्यास सुरुवात केल्यानंतर शेतकरी संपाच्या कथा, व्यथा आणि वस्तुस्थिती लोकांसमोर यावी म्हणून 7 जून 1937 साली नारायण नागू पाटील यांनी भगवान गौतम बुद्धांचे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कृषीवल साप्ताहिक सुरु केले.
खोती निर्मूलन कायदा
1936 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापनाही केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदूर पक्षाच्या 14 आमदारांच्या पाठिंब्यावर 17 सप्टेंबर 1939 रोजी खोती पद्धत बंद करण्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. त्यानंतर सरकारला जाग आली. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळातील महसुलमंत्री मोरारजी देसाई यांचा लवाद सरकारनं नेमला. मोरारजी चरीला आले. दोन्ही गटांशी त्यांनी चर्चा केली आणि उभयमान्य तोडगा सुचविला. शेतकर्यांच्या बर्याच मागण्या मंजूर केल्या गेल्या. त्यामुळे 27 ऑक्टोबर 1933 पासून 1939 पर्यंत 6 वर्षे जमीन न कसता शेतकर्यांनी केलेला संप अखेर संपुष्टात आला. या आंदोलनाचे फलीत म्हणजे 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर संपूर्ण भारतात अत्यंत प्रगत कृषीविषयक कायदे महाराष्ट्र राज्याने केले. खोती निर्मूलन अधिनियम 1949 मध्ये लागू करुन खोती पद्धतीचा अंत केला. त्यामुळे कुलाबा जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख एकर जमीन खोत-सावकार- जमीनदारांच्या मगरमिठीतून मुक्त झाली. पुढे 1957 मध्ये कुळकायदा आला व ‘कसेल त्याची जमीन’ हे तत्व रुढ झाले. पहिल्या टप्प्यात कुलाबा जिल्ह्यातील 82,830 शेतकर्यांना (कुळांना) जमिनीचे मालकी हक्क मिळाले. संपत्तीचे समन्यायी वाटप झाले. अर्थात यामागे चरीच्या संपकरी शेतकर्यांचा त्याग आहे. नारायण नागू पाटलांचे नेतृत्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा आहे.
बाबासाहेबांची प्रेरणा
