रायगडच्या बळीराजाची आधुनिकतेकडे वाटचाल

यंत्राद्वारे भात लावणीला प्राधान्य; मजूर समस्येवर उपाय
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

भाताचे कोठार अशी ख्याती असलेल्या रायगडातील बळीराजा आता आधुनिक शेती करण्यावर विशेष भर देऊ लागला असून, भातशेतीतील मजूरांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून यावर मात करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. येत्या कालावधीत यामध्ये वाढ करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला असून त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. म्हणून या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभाग घेवून भातशेतीमध्ये यांत्रिकी पद्धतीचा उपयोग वाढवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्जवला बाणखेले यांनी केले आहे.

वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भातशेतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. यामुळे शेती परवडत नाही, अशी अडचण शेतकरी व्यक्त करीत असतात. त्यामुळे बळीराजाच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या वतीने रायगड जिल्हातील खालापूर व रोहा येथील शेतकरी व शेतकरी गटांना यंत्राच्या सहाय्याने भात लावणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यांत्रिकीकरण व पारंपारिक पद्धतीने भात लागवड केल्यास कसा फरक पडतो व यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे भातशेती कशी फायद्याची आहे, याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकर्‍यांना केले गेले. त्यामुळे या पद्धतीने लागवडीसाठी शेतकरी तयार झाले. यांत्रिकीकरण पद्धतीत मजूर कमी लागतात व रोपवाटिकेचा खर्च सुद्धा कमी होतो त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

उत्पादन वाढीला प्राधान्य
भात शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन जिल्ह्यामध्ये करण्यात आले असून यामध्ये चारसूत्री पद्धतीने भात लागवड, एसआरटी पद्धतीने भात लागवड, ड्रम सीडरद्वारे भात लागवड व यांत्रिक पद्धतीने भात लागवड यांचा समावेश आहे. शेतकर्‍यांचा कल यंत्राद्वारे भातशेतीकडे वाढविण्यासाठी जिल्ह्यातील खालापूर व रोहा येथील शेतकरी व शेतकरी गटांच्या माध्यमातून यंत्राद्वारे यशस्वीरित्या भात लावणी करण्यात आली आहे.

अशी करा लागवड
यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी प्रथमत: रोपवाटिका तयार करण्यासाठी शेतातील माती चाळून घ्यावी लागते. एक हेक्टर क्षेत्राच्या रोपवाटिकेसाठी लागणारी माती चाळण्याचे काम एक मजूर एक दिवसात करतो. मॅट रोपवाटिका तयार करण्यासाठी प्लास्टिक ट्रे 27.5 द 21.5 सें.मी.चे 2 याप्रमाणे 300 ट्रे लागतात. ते साधारण तीन हजार रुपये किंमतीचे होतात. प्रत्येक ट्रेमध्ये साधारणपणे 80 ते 90 ग्रॅम बियाणे प्रति ट्रे प्रमाणे 25 किलो बियाणे प्रति हेक्टर लागते. ते पारंपारिक पद्धतीपेक्षा 15 किलो ने कमी लागते. रोपवाटिका तयार करताना प्रथमतः 60 ते 70% ट्रे मातीने भरून घेऊन त्यामध्ये 20 ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे 15:15:15 हे खत मातीत मिसळून त्याच्यावर एकसमान बियाणे पसरवावे लागते. त्यानंतर वरून चाळणीने मातीचा थर द्यावा लागतो. त्यावर भाताचा पेंडा झाकून सकाळ व संध्याकाळी फवारणी पंप च्या साहाय्याने पाणी द्यावे लागते, जेणेकरुन बी बाहेर पडणार नाही. ही रोपवाटिका 18 ते 21 दिवसात तयार होते. पावसाचा खंड जरी पडला तरी कमी पाण्यावर रोपवाटिका तयार करू शकतो. याप्रमाणे तयार केलेली रोपवाटिका बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या (महिंद्रा, कुबोटा, इ.) भात लावणी यंत्राद्वारे दोन मजूरांच्या सहाय्याने करता येते. एका दिवसात 4 रांगांच्या यंत्राद्वारे 2 ते 3 हेक्टर क्षेत्रावर लावणी होवू शकते. त्यासाठी एकरी 1 ते 1.5 लिटर पेट्रोल लागते. भात लावणी यंत्र एका हंगामात 40 हेक्टर पर्यंत लावणीचे काम करु शकते. यासाठी पाच हजार रुपये पर्यंत देखभाल व दुरुस्ती खर्च येतो. पारंपारिक पद्धतीने भात लावणी करावयाची झाल्यास हेक्टरी 30 मजूर लागतात. त्या तुलनेत यंत्राद्वारे केवळ 2 मजूरांद्वारे भात लावणी होते. त्यामुळे मजूरी खर्चात 90 टक्के पर्यंत बचत होवून शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होते.


अनुदानासाठी आवाहन
बाजारात 4 रांगांचे भात लावणी यंत्र 2.5 ते 3.0 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असून कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण या योजनेतून त्यास 50 टक्के अनुदान मिळते. यासाठी शेतकर्‍यांनी योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर (https://mahadbtmahait.gov.in) अर्ज करावा, अर्ज केल्यानंतर आपली लॉटरी पद्धतीने निवड होईल. त्यानंतर शेतकर्‍यांनी त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून टेस्टिंग रिपोर्ट उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे यंत्र खरेदी करावे. यंत्र खरेदी केल्यानंतर कृषी पर्यवेक्षकांमार्फत त्याची तपासणी करुन देय 50 टक्के अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जिल्हास्तरावरुन तात्काळ वितरीत करण्यात येईल.

भातशेतीतील मजुरांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून यावर मात करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. येत्या कालावधीत यामध्ये वाढ करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला असून त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. म्हणून या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभाग घेवून भातशेतीमध्ये यांत्रिकी पद्धतीचा उपयोग वाढवावा.

उज्जवला बाणखेले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Exit mobile version