परतीच्या पावसामुळे बळीराजा चिंताग्रस्त

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

गेले अनेक दिवस परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्यामुळे तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असल्यामुळे त्यातच सायंकाळी पावसाची जोरदार बॅटींग आणि सोसाट्याचा वारा यामुळे भात शेती पडत आहे. मात्र, परतीचा पाऊस सायंकाळी येत असल्यामुळे हीच स्थिती सातत्याने राहिली तर हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळणार नाही, आशी भिती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.

भात शेती कापण्यायोग्य होण्यास काही दिवसांचा विलंब असून, परतीच्या पावसाच्या भीतीने फक्त भात शेतीचे होत असलेले नुकसान पाहण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील असलेली भात शेती अनेक ठिकाणी ओस पडत चालली आहे. त्यांचे कारण म्हणजे मातीत टाकलेला पैसा वसूल होत नाही. शिवाय हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळत नाही. तसेच, अस्मानी संकटाचा दरवर्षी शेतकरी वर्गास सामना करावा लागत असल्यामुळे भात शेती अल्प होत आहे. मात्र, असे असले तरी सुद्धा तालुक्यात गेल्या काही वर्षात तुरळक स्वरूपात भात लागवड करण्यास वाढ झाली आहे. मात्र, परतीच्या पावसाची दहशत आजही बळीराजास चिंताग्रस्त करून ठेवत आहे.

Exit mobile version