हवामान विभागाचा अंदाज
। मुंबई । प्रतिनिधी ।
संपूर्ण मे महिन्यात देशातील तापमानात वाढ होणार असून, कोकणाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेबरोबर घाम काढणाऱ्या दमट वातावरणाचाही पाच दिवसांत सामना करावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि.4 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मात्र, 6 व 7 मे रोजी कदाचित कमाल व किमान अशा दोन्हीही तापमानात काहीशी घट होऊन सध्याच्या वातावरणापासून काहीसा दिलासाही मिळू शकतो, असे वाटते. त्यामुळं पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.