गोरगरीब मुला-मुलींना सायकल वाटप; शिक्षणाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले असून, हीच परंपरा पुढे नेत गोरगरीबांच्या मुलांसाठी मोफत सायकल देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सहाणपासून सुडकोलीपर्यंतच्या गावांमधील हजारो मुले व मुलींना सायकल दिल्याचा खऱ्या अर्थाने आनंद आहे. शाळेत जाण्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न यातून केला आहे. जनतेच्या सेवेसाठी शेकाप कायमच कटीबध्द आहे, असे प्रतिपादन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.
चित्रलेखा पाटील यांच्यामार्फत मुला-मुलींनी मोफत सायकल वाटप कार्यक्रम अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथे रविवारी (दि.4) आयोजित करण्यात आला. यावेळी शेकाप तालूका माजी चिटणीस अनिल पाटील, शेकाप तालूका चिटणीस सुरेश घरत, मोहन धुमाळ, राजेंद्र म्हात्रे, प्रकाश खडपे, गणेश धुमाळ, विक्रांत वार्डे, निकीता राऊत, जनार्दन शेळके, नामदेव तांबडकर, प्रिती तांबडकर, बाळू पाटील, अमित देशमुखआदी मान्यवर, शेकापचे वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कुदेपासून सहाणपर्यंतच्या गावातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते हा सायकल वाटप वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणारी मुले आणि मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, हा उद्देश ठेवून शेकाप नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल वाटपाचा नाविन्य उपक्रम सुरू केला. कष्टकरी, कामगारांचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील, माजी विरोधी पक्ष नेते दिवंगत दत्ता पाटील यांनी शिक्षणाचा सुरु केलेला वारसा जपण्याचे काम केले जात आहे. शिक्षण हेच सर्वेसर्वा आहे, हे जाणून गोरगरीबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सायकल देऊन सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांना केंद्र बिंदू ठेवून काम केले जात आहे.
तसेच, या परिसराचा विकास हा शेकापच्या माध्यमातून केला आहे. उमटे धरणातील गाळाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. या भागातील रस्त्यांची समस्या बिकट आहे. चांगले लोक प्रतिनिधी असल्यास गावांचा विकास नक्की होतो. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत आहेत. शेकापकडून सर्वसामान्यांच्या मनातला उमेदवार दिला जाईल. शेतकरी कामगार पक्ष, पाटील कुटूंबिय जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी दिले.
पुढे त्यांनी सांगितले की, देशसेवेसाठी नांगरवाडी येथील तरुणीची निवड झाली आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आई, वडीलांनी केलेल्या त्यागामुळे हे शक्य झाले आहे. गावाचा, समाजाचा, अलिबागचा आणि रायगड जिल्ह्याचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम या तरुणीने आपल्या मेहनतीने केले आहे, असे गौरवोद्गार चित्रलखा पाटील यांनी काढले.
हजारो मुला-मुलींच्या चेहऱ्यावर हसू
घरापासून शाळेचे अंतर तीन ते पाच किलोमीटर आहे. कधी चालत, तर कधी अन्य वाहनांचा आधार घेत शाळेत जावे लागते. ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळेतील मुला-मुलींची गळती कमी झाली पाहिजे, ही भूमिका घेत शेकाप प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्या सौजन्याने शासनाच्या एक पाऊल पुढे जात हजारो मुला-मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. सहाणपासून कुदेपर्यंतच्या 30हून अधिक गावांतील विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळाला. हा आगळावेगळा कार्यक्रम नांगरवाडी येथे घेण्यात आला. सायकली मिळाल्याने मुला-मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला.
सृष्टी धुमाळ यांचा सन्मान
सैन्य दलात निवड झाल्याबद्दल नांगरवाडी येथील तरुणी सृष्टी धुमाळ यांचा या कार्यकमाच्या निमित्ताने विशेष सन्मान करण्यात आला. शेकाप प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
