। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सातबारा उतारा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शहरीकरणात वाढ झाली आहे. तर, बऱ्याच शहरांमध्ये शेतजमीनच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या शहरांत सिटी सर्व्हे झाले आहे आणि सातबारा उताराही सुरू आहे, त्या शहरांत सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आलेला आहे. मात्र, कर चुकवण्यासाठी आणि इतर लाभ मिळावेत यासाठी सातबारा वापरला जातो. तसेच काही ठिकाणी तर फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवातीला काही शहरांत करण्यात येणार आहे.
कोणत्या शहरांत अंमलबजावणी?
नाशिक, सांगली, मिरज आणि पुण्यातील हवेली तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर केली जाणार आहे. त्यानंतर राज्यात लागू करायचा की, काय याबाबत विचार केला जाणार आहे.