मोठी बातमी! गडचिरोलीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा

| गडचिरोली | वृत्तसंस्था |

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात सातत्यान नक्षली कारवाया होतात. त्यातूनच, नक्षल आणि पोलिसांमध्ये चकमक होत असते. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच या घटनांचा त्रास होत असतो. आता, त्याच नलक्षग्रस्त गडचिरोलीत पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या नक्षल चकमकीत 8 नक्षली ठार झाले आहेत. नक्षलग्रस्त भागातील या चकमकीनंतर जवान मुख्यालयी परतत आहेत. ह्या दरम्यान इंद्रावती नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत पोलीस जवान नक्षल्याचे मृतदेह आणि नक्षल साहित्य खांद्यावर घेऊन जात असताना दृश्यामध्ये दिसत आहे.

नारायणपूर अबुझमाडच्या सीमावर्ती भागातील रेकाव्याच्या जंगलात कालपासून सुरू असलेली पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक संपली. या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या सर्वांचे मृतदेह सापडले असून चकमकीनंतर पोलीस व सैन्याचे जवान मृतदेह घेऊन मुख्यालयाकडे परतत आहेत. मुख्यालयात जाण्यासाठी सैनिक इंद्रावती नदी पार करतानाचे व्हिडिओतून दिसून येत आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर या तीन जिल्ह्यांच्या संयुक्त सुरक्षा दलामुळे हे यश मिळाले आहे.

या कारवाईत तीन जिल्ह्यांतील पोलीसही सहभागी झाले होते, हे संयुक्त ऑपरेशन होते. डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफच्या 800 जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. नक्षलवाद्यांना पळून जाण्याचा मार्गही नव्हता. आयईडी पेरल्यानंतर ते घनदाट जंगलात लपून बसले होते आणि छुप्या पद्धतीने गोळीबार करत होते, पण त्यांना त्यांच्या मनसुब्यात यश आले नाही. नक्षलवाद्यांची संख्या आणि कारवाया पाहून जवान सतर्क होते, अखेर त्यांनी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, नक्षलवादी मोहिमेअंतर्गत छत्तीसगड सरकारही नक्षलवाद्यांवर सातत्याने कारवाई करत आहे.

Exit mobile version