। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा वंदे भारत रेल्वे लवकरच सुरु होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आज मंगळवारी या गाडीसाठी रुळांची चाचणी (TRIAL) घेतली जाणार आहे. ही गाडी चालू झाल्यावर मुंबई वरून सुटणारी ती चौथी गाडी ठरणार आहे. या आधी मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-गांधीनगर, मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सध्या मुंबईवरून सोडण्यात येणार आहे.
मार्च महिन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी-मडगांव दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचे नियोजन केले आहे. वंदे भारत ट्रेनचे आज मंगळवारी (दि.16) चाचणी घेण्यात येणार आहे. आज सकाळी सीएसएमटीवरून सोळा डब्याची वंदे भारत ट्रेन मडगांवसाठी रवाना झाली आहे. या चाचणी दरम्यान रेल्वे बोर्डाचे आणि मध्य आणि कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थितीत असणार आहेत.
कोकण रेल्वेमार्गावर झालेल्या 100% विद्युतीकरणामुळे या मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस चालवणे शक्य होणार आहे. या प्रस्तावित गाडीमुळे मुंबई-गोवा या दरम्यान वाहतुकीचा एक जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. ही गाडी काही महत्वाचे आणि मोजकेच थांबे घेणार आहे. रुळांची चाचणी यशस्वी झाल्यावर इतरही तांत्रिक बाजू तपासून ही गाडी लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
मोठी बातमी! कोकण रेल्वेमार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
![](https://krushival.in/grygrars/2023/05/Bullet-Train-1024x629.jpeg)