| नवी मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे मार्गावर नेरुळ उड्डाणपुलावर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनय जाधव (29) असे त्याचे नाव आहे. तो मोटारसायकलने अलिबागला जात असताना डंपरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय जाधव मुंबईतील गिरगाव भागात राहत होता. तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. शनिवारी (दि.12) दुपारी तो आपल्या बाईकवरून गिरगावहून अलिबागला निघाला होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास विनय मुंबई-पुणे हायवेवरील नेरुळ येथील एलपी उड्डाणपुलावरून जात होता. त्याचवेळी मुंबईकडून उलवेच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव डंपरने त्याला जोरदार धडक दिली. डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने विनय गंभीर जखमी झाला. आसपासच्या लोकांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी डंपरचालक सुरज चौरसिया (24) याला अटक केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. विनयचा 13 जुलै रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास करत आहेत.