| पाली | वृत्तसंस्था |
पाली काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका पशुपक्ष्यांनाही बसला आहे. वादळी वार्यामुळे अनेक पक्ष्यांची घरटी व अंडी पडली आहेत. शिवाय नवे घरटे बांधण्यातही बाधा येत असल्याचे नोंद पक्षी अभ्यासक शंतनू कुवसेकर यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात उष्मा काहीसा कमी झाल्याने पशुपक्षी सुखावले होते, मात्र दोन-तीन दिवस पडलेल्या वादळी पावसामुळे पक्ष्यांची मोठी वाताहत झाली. झाडांवरील घरटी कोसळल्याने पक्ष्यांचे आश्रय हरपला आहे. यात दयाळ, क्षमा, तुरेवाली पाकोळी, मैना, तांबट, बुलबुल, ब्राह्मणी व साधी घार आदी पक्ष्यांच्या घरट्यांचा समावेश आहे. पाकोळी पक्ष्यांची अंडी हलकी असतात, वार्यामुळे ती उडून गेली आहेत. घुबड किंवा इतर पक्षी जे झाडाच्या डोलीमध्ये घरटे करतात, त्यांची घरटी सुरक्षित राहिली. मात्र काही झाडे व झाडाच्या फांद्या पडल्यामुळे त्यांच्या घरटी बाधित झाली. त्यामुळे त्यांच्या प्रजनन व जीवन चक्रावरही परिणाम झाला आहे. नव्याने बांधणीस सुरुवातबरेचसे पक्षी डिसेंबर व मे अशी साधारण दोन वेळा घरटी बांधतात. पावसाच्या आगमनापूर्वी पक्षी आपली घरटी बांधून पूर्ण करतात. त्यानुसार काही पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होती, मात्र अवकाळीने घरटी बाधित झाली. आता अनेक पक्ष्यांनी नव्या उमेदीने घरटे सावरण्यास सुरुवात केली आहे.
खाद्य, पाण्याची उपलब्धता अवकाळी पावसामुळे मुंग्या, वाळवी, बेडूक यांसारखे किटक सक्रिय झाले आहेत. हे सर्व प्राणी पक्ष्यांचे आवडीचे भक्ष असते. पावसामुळे अनेक ठिकाणी डबकी, नदी ओहोळ यांच्यात काही प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे पक्ष्यांसह इतर प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण थांबली आहे.
दख्खनकडे स्थलांतर अवकाळी पाऊस सतत सुरू राहिला तर अनेक पक्षी दख्खनकडे म्हणजे पुण्याकडे स्थलांतरित होतील, अशी शक्यता पक्षी अभ्यासक कुवेसकर यांनी वर्तवली आहे. या स्थलांतरामध्ये त्यांची परवड होते, मात्र स्थलांतराशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो, कारण त्यांना चांगल्या निवार्याची व हवामानाची आवश्यकता असते.