| सोलापूर | प्रतिनिधी |
शेतकर्यांच्या मतांचा फायदा घेत भाजप सत्तेत आले, पण शेतकरी अडचणीत असताना त्यांच्याकडे पाठ फिरविली, अशी टीका महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्याच्या प्रचार दौर्यावेळी केली. दहा वर्षांत सोलापूरकरांचा भाजपकडून विश्वासघात झाल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच, महागाईने जनता त्रस्त झाली असून चारशे रुपयांचा गॅस सिलिंडर अकराशेंवर पोचला आहे. शेतकर्याच्या शेतमालाला भाव नाही. त्यामुळे मत मागण्याच्या उद्देशाने नव्हे तर सर्वसामान्य शेतकर्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी मी गावभेट दौरा करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून जनतेने त्यांचे उमेदवार निवडून दिले, परंतु आता त्यांचीच क्रेझ संपल्यामुळे भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही त्या म्हणाल्या. तर भगीरथ भालके यांनी गटतट विसरून प्रणिती शिंदे यांना मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी आ. प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली, मगरवाडी, तारापूर, खरसोळी, पोहरगाव, विटे, आंबेचिंचोली, शंकरगाव या गावांचा दौरा केला. यावेळी भगीरथ भालके, प्रणिता भालके, प्रकाश पाटील, अमर सूर्यवंशी, सूनांजय पवार, संदीप पाटील, संदीप शिंदे, गणेश माने, महेश अधटराव, सतीश शिंदे, राहुल पाटील, मिलिंद मोलाने, नितीन शिंदे, अनिल माने, कल्याणराव बप्पा पाटील, राहुल पाटील, किशोर जाधव, संग्राम जाधव आदी उपस्थित होते.