भाजपचे हिंदुत्व विकृत; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

विरोधकांचा घेतला समाचार
| मुंबई | प्रतिनिधी |
आमचे हिंदुत्व हे बोगस नसून,अस्सल आहे.शिवसेनाप्रमुखांना हिंदुत्वाचा विचार दिला, पण भाजपने हिंदुत्वाचा विकार दिला,अशा कडक शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (14 मे) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसंपर्क अभियानांतर्गत बीकेसीच्या मैदानात ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली होती.आठवडाभरापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे,भाजपनेही अशाच सभा आयोजित केल्या होत्या.त्या सभांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने ही जाहीर सभा आयोजित केली होती.यावेळी ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपवर कडाडून हल्लाबोल केला.
ज्या जागेवर आपली सभा होतेय, इथे ते बुलेट ट्रेन आणत आहेत. आपण मागितली का बुलेट ट्रेन? झाली उद्या बुलेट ट्रेन, तरी आपल्यापैकी किती लोक जाणार तिकडे. हा मुंबई तोडण्याचा डाव चाललाय. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय? देश पारतंत्र्यात आहे का? मला फडणवीसांना प्रश्‍न विचारायचा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात संघ होता. पण एकदाही संघ स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नाही. असेल तर दाखले दाखवा.असा सवालही त्यानी उपस्थित केला.

आपण एक मे जेव्हा साजरा करत होतो, तेव्हा भाजपाची सभा होती. तेव्हा सभेत फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठात आलं. त्यांच्या मालकाची इच्छा बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

हल्ली खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मी मध्ये बोललो होतो की आमचं हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. ते म्हणाले मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन आपण पिुढे जातोय. आपलं हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचं घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा.अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

आम्ही काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत गेलो पण ते उघडपणे गेलो.तुमच्यासारखा पहाटेच्यावेळी शपथविधी करुन घेतला नाही,असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.अयोध्या मुद्यावरुन बोलताना त्यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.काश्मिर पंडित,एनडीए आदी मुद्यावरही त्यांनी भाष्य केले.

राज ठाकरे म्हणजे मुन्नाभाई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे मुन्नाभाई असल्याची उपहासात्मक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.काहीजण सध्या अंगावर भगवी शाल पांघरुण फिरत आहेत.फिरु द्या,आपण बाळासाहेब असल्याचा भास त्याना होतोय.हा केमिकल लोच्या असल्याची टीकाही त्यांनी केली.

आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Exit mobile version