तालुक्यात मणिपूर ब्लॅक तांदळाचा पहिलाच प्रयोग
पौष्टीक तादळाला आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी
| भाकरवड | जीवन पाटील |
औषधी गुणधर्म असलेल्या काळ्याकुट्ट तांदळाची लागवड आता जिल्ह्यातही होऊ लागली आहे. अलिबाग तालुक्यातील चरी-पळी येथील शेतकरी एन.बी. जाधव यांनी पंधरा गुंठे क्षेत्रात लागवड केली असून, त्यांना 700 ते 800 किलो काळ्या तांदळाचे (मणिपूर ब्लॅक तांदूळ) उत्पादन अपेक्षित आहे. इतर शेतकर्यांनीही या तांदळाचे उत्पादन घेतल्यास निश्चितच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
300 ते 400 रुपये किला दर असणारा हा तांदूळ भविष्यात जिल्ह्यातील उन्नतीत महत्त्वाचा हातभार लावणार आहे. या तांदळाचे उत्पादन मणिपूर उत्तर प्रदेश येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात या काळ्या तांदळाच्या बियाण्याची लागवड करतात. प्रामुख्याने औषधी कंपन्या हा तांदूळ तेथील शेतकर्यांकडून खरेदी करतात. या तांदळापासून पौष्टीक आहार तयार करण्यासंदर्भात वाराणसीतील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र, इरी येथे संशोधन चालू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया पदार्थ उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणने मदत केली आहे.
या नव्या पदार्थाला ‘कॉर्नप्लेक्स’ असे नाव देण्यात येणार असून, ते दुधाबरोबरसुद्धा खाता येईल. या नव्या आहाराचा उपयोग सर्वसामान्य लोकांबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच रुग्णांनादेखील होणार आहे. या जातीच्या तांदळापासून ब्रेड, कुकीज तयार करण्यात येत आहेत. वाराणसीतील बाजारपेठेत चांगली मागणी आहे. बाजारात डब्बाबंद खीर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारात या तांदळाचा दर 300 ते 400 रूपये किलो आहे. हा तांदूळ रायगडातही उत्पादित झाला तर इथल्या शेतकर्यांचे जीवनमान उंचावेल. हा ध्यास घेऊन तालुक्यातील चरी-पळी येथील प्रगतीशील शेतकरी जाधव यांनी काळ्या तांदळाच्या बियाण्याची लागवड केली आहे.
पौष्टीक आहारानिर्मितीसाठी वापर
नव्या पौष्टीक आहारात नैसर्गिक सुगंध यावा यासाठी त्यामध्ये गूळ आणि सुका मेवादेखील मिसळून खाऊ शकता. थोडक्यात कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करून भातपीक आपल्या घरी खाण्यापुरता लावून उर्वरित शेतात मणिपूर ब्लॅक राईसचे उत्पादन घेण्यास काहीच हरकत नाही. आपल्या नेहमीच्या आहारात पारंपरिक पद्धतीत मोदक, इडली, घावन, भाकरी यामध्ये या तांदळाचा वापर केल्यास पौस्टिकता वाढेल, असे मत श्री. जाधव यांनी व्यक्त केले आहे.
भात पेरणीनंतर 120 दिवसांत हे भात तयार झाले. हे पीक कमी उंचीचे आहे, त्यामुळे लोळण घेत नाही, तसेच कणीसही मोठे आहे. यात सुदैवाची बाब म्हणजे, परतीचा पाऊस कोसळण्याआधीच या भाताची कापणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या भाताचे नुकसानदेखील टळले आहे, अशी माहिती शेतकरी श्री. जाधव यांनी दिली.