तब्बल पाच वर्षांनी होणार दिल्लीत कसोटी सामना
| मुंबई । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौर्यावर येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही मालिका अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरवू शकते. सध्या ऑस्ट्रेलियन संघ 70 गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारतीय संघ 52.08 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका (60) दुसर्या तर श्रीलंका (53.33) तिसर्या स्थानावर आहे. गुणतालिकेत अव्वल दोन संघ पुढील वर्षी अंतिम सामना खेळतील.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, ज्याला बॉर्डर-गावसकर करंडक म्हणूनही ओळखले जाते, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रस्तावित आहे. बीसीसीआयने, तारखा आणि यजमान शहर अद्याप जाहीर केलेले नाही. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होऊ शकतो. मात्र, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम चारपैकी एका कसोटी सामन्याचे आयोजन करू शकते. असे झाल्यास अरुण जेटली स्टेडियम पाच वर्षांनंतर कसोटी सामन्याचे आयोजन करेन.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ही मालिका चार सामन्यांची असून त्यांतील एक सामना दिल्लीत खेळला जाईल. राहिलेले तीन सामने अहमदाबाद, धर्मशाला आणि चेन्नई याठिकाणी खेळले जाण्याची पूर्ण शक्यता सांगितली गेली आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामातील भारताचे हे शेवटचे चार कसोटी सामने असतील. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला ही मालिका 4-0 अशा अंतराने जिंकावी लागणार आहे. मात्र, रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देईलच याची खूप कमी शक्यता आहे.