‘आनंद शिधे’पासून कर्जतकर वंचित

| नेरळ | प्रतिनिधी |
राज्य शासनाने रेशनवर धान्य घेणार्‍या रहिवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाची शिदोरी देण्याचा निर्णाय घेतला होता. दरम्यान, ती शिदोरी न मिळताच अनेक रहिवासी रेशन दुकानातून परत जात आहेत. त्यामुळे सर्व रेशन धान्य ग्राहकांना दिवाळी देण्याची मागणी वंचित आघाडीकडून कर्जत तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. तर ऐन दिवाळीत जाहीर केलेले साहित्य गोरगरीबांना न मिळणे ही चक्क सरकारने गोरगरीबांची केलेली चेष्टा आहे. वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांनी त्याचा निषेध केला.

राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता सरकारने 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता. सरकारची घोषणा कागदावरच राहिली आहे, कारण दिवाळी गोड करण्यासाठी गेलेले नागरिक रिकाम्या हाती परतले आहेत. सरकारने सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली दिसत नाही. स्वस्त धान्य दुकानात गोरगरीब सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तु आल्यात का? असे विचारत आहे. त्यात अद्यापही या वस्तु न आल्याचे कळताच नागरिक नाराजी व्यक्त करत असून रिकाम्या हाती घराकडे परतत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनाही याबबात कुठलीही कल्पना नसल्याने दिवाळी गोड करण्याबाबत आलेल्या निर्णयाची कुठलीही स्पष्टता होत नाहीये. त्यामुळे सरकारने सामान्य नागरिकांसाठी घेतलेला निर्णय कागदावरच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदरील निवेदनामार्फत सरकारने जाहीर केलेले दिवाळीचे साहित्य लवकरात लवकर देणेत यावे ही मागणी केली आहे. सदरील निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे. जिल्हा उपाध्यक्ष हरिश्‍चंद्र यादव, जिल्हा सचिव अनिल गवळे, जिल्हा संघटक सुनील गायकवाड, शहर अध्यक्ष लोकेश यादव, शैलेश खोब्रागडे, विकी जाधव, कमलाकर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version