मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती
| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे. या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत नदीत काही पर्यटक बुडाले होते. त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पूल तुटल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोक वाहून गेले आहेत. याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 20 ते 25 लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.