। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील आगरदांडा ते नांदले गावातील रस्ता गेले अनेक वर्षे खड्डेमय व नादुरुस्त असूनसुद्धा मुरुड सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर कंटाळून ग्रामस्थांनी 20 मे रोजी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. सदरचे निवेदन तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम खाते व मुरुड पोलीस ठाणे योना देण्यात आले आहे. यामुळे या दिवशी भालगावमार्गे रोहा या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प राहणार आहे.
दिघी पोर्ट साठी आगरदांडा ते इंदापूर रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनवण्यात आला. परंतु यासाठी भला मोठा दगडी डोंगर चिरून आगरदांडा गावापासून नजीकचा रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे मोठं मोठी वाहने नजीकच्या रस्त्याने सध्या वाहतूक सुरु आहेत. यामुळे मात्र जुना रस्ता हा तसाच राहिला. गावातून जाणार्या रस्त्यामधून एसटी वाहतूक होते. या रस्त्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने हा रस्ता खड्डेमय असून, तसाच राहिला आहे.
ग्रामस्थांनी हा रस्ता होण्यासाठी दि. 17 फेब्रुवारी रोजी मुरुड बांधकाम खात्यास निवेदन देऊनसुद्धा यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. सदरचा रस्ता नादुरुस्त असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. गेली कित्येक वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतेही लक्ष न दिल्यामुळे येथील ग्रामस्थ रास्ता रोको करून आपला राग व्यक्त करणार आहेत.सदरचे निवेदन देतेप्रसंगी पंचक्रोशी कुणबी समाज अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष रामा आरकर, सचिव सचिन पाटील, हरिश्चंद्र शिवणे, सुरेश पाटील, कृष्णा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.