हेमंत खरसांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुसूंबळेतील हेमंत खरसांबळे यांच्यावर मंगळवारी (दि.8) रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर हॉकी स्टीकने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. शिंदे गटातील राजा केणी यांच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे. ही घटना घडून 12 तास उलटले आहेत. मात्र अद्यापही मारेकरी मोकाट असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेने अलिबागमध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांची गुंडगिरी वाढली आहे. ही गुंडगिरी रोखण्यास रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यशस्वी ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खरसांबळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजा केणी यांच्या समर्थकाचा संदीप पाटील यांच्यासोबत वाद झाला होता. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, वाद विकोपाला जाऊ नये, यासाठी खरसांबळे यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन वाद मिटवला. त्यानंतर ते पोयनाड पोलीस ठाण्यातून त्यांच्या कुसंबळे येथील घरी दुचाकीवरून निघाले. श्रीगावजवळ सदगुरू हॉलजवळ आल्यावर झाडांच्या फांद्या रस्त्यावर आडव्या टाकलेल्या होत्या. त्यावेळी खरसांबळे यांनी त्यांच्या गाडीचा वेग कमी केला. दरम्यान भुषण पाटील, संजय पाटील, चेतन वावेकर व इतर काही मंडळींनी हॉकी स्टीकचा जीवघेणा हल्ला खरसांबळे यांच्यावर केला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतामध्ये ते बेशुध्द अवस्थेत पडले. तसेच त्यांच्या गाडीचेदेखील नुकसान झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी त्यांच्या मागून त्यांचा भाचा संदीप त्यांच्या चारचाकी गाडीतून कुटूंबियांसमवेत येत असताना त्यांच्या गाडीवरही गाव गुडांनी हल्ला केला. त्यामध्ये चारचाकी गाडीचे नुकसान झाले. यावेळी त्यांच्या सोबत संदीप पाटील यांची आई, पत्नी व दहा वर्षाचा मुलगा गाडीत होता. सुदैवाने ते बचावले. याप्रकरणी पोयनाड पोलिसांना कळविण्यात आले. परंतु पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे. रात्रीच्यावेळी झालेल्या हल्ल्याची साधी तक्रारही त्यांनी घेतली नाही. पोलिसांच्या या भुमिकेबाबत खरसांबळे यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. राजा केणीच्या सांगण्यावरून हा हल्ला केला केला असल्याचे ते म्हणाले. या गुंडगिरीमुळे परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.
कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांची बघ्याची भुमिका
हेमंत खरसांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी पोयनाड पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. तरीदेखील त्याठिकाणी तात्काळ पोलिस पाठविले नाही. पोलिस ठाण्यात गेल्यावर माहिती देऊनही मारेकर्यांविरोधात गुन्हा दाखल केला नाही. कर्तव्यावर असणार्या पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतल्याचा आरोप खरसांबळे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
राजा केणीने मारण्याचा प्लॅन पोलीस ठाण्यातूनच केला?
शिंदे गटातील सदस्यासोबत झालेले भांडण खरसांबळे यांच्या मध्यस्थीने पोलीस ठाण्यात मिटविण्यात आले. त्यावेळी राजा केणी त्याच ठिकाणी होते. प्राणघातक हल्ला बारा वाजण्याच्या सुमारास झाल्यावर खरसांबळे यांचे कुटूंबिय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी राजा केणीदेखील पोलीस ठाण्यामध्येच होते. त्यामुळे त्यांनीच हा प्लॅन आखला असल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे.







