। पाली-बेणसे । वार्ताहर ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना हिन आणि गुलामगिरीची वागणूक देणारे, त्यांचे नैसर्गीक स्वातंत्र हिरावून घेणार्या मनुस्मृतीचे दहन केले. पुढे महिलांना समान हक्क व अधिकार देणारे हिंदु कोड बिल व संविधान या देशाला बहाल केले. कालपर्यंत मनुवादी व्यवस्थेने नाकारलेल्या स्त्रीला आज स्वतंत्रपणे व्यक्त होण्याचा अधिकार प्राप्त झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करुन समस्त स्त्रियांचा उद्धाराचा मार्ग मोकळा केला असल्याचे प्रतिपादन महेश पोंगडे महाराज यांनी केले. पुरोगामी विचारवंत महेश पोंगडे महाराज यांच्या नेतृत्वात पालीत प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
मनुस्मृती या प्राचीन ग्रंथामध्ये अस्पृश्य, शूद्र आणि स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे आणि श्लोक सुद्धा आहेत. या ग्रंथामुळे जातिव्यवस्था, अस्पृश्यता, जातिबंधने बळकट झालेली होती. त्यामुळे महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी सर्वप्रथम मनुस्मृती ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले आहे. त्यामुळे भारतात 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश पोंगडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुधागड तालुक्यातील पाली या शहरात मनुस्मृती ग्रंथाच्या प्रतीकात्मक प्रतींचे दहन करण्यात आले. यावेळी संजय ठकोरे, अविनाश गायकवाड, शंकर शेवाळे, विकास चोरघे, गणेश शिंदे, निलेश शिंगरे, पांडू रटाटे, प्रकाश कामते व इतर नागरिक उपस्थित होते.