वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणार्यांवर विरोधात मोहीम; अन्न व औषध प्रशासन उगारणार कारवाईचा बडगा
| आविष्कार देसाई | रायगड |
अन्न पदार्थ विकत घेताना संबंधित दुकानदार आपल्याला वर्तमानपत्रात पदार्थ गुंडाळून देतात. आपणही याबाबत कोणतीच तक्रार न करता ते मुकाटपणे स्वीकारतो. आपण मागचा-पुढचा कसलाच विचार न करता त्यातील पदार्थ खातो. मात्र, वर्तमानपत्राची शाई आरोग्याला अतिशय घातक आहे. असे असतानासुद्धा वर्तमानपत्राचा वापर सरार्सपणे करण्यात येत असून, अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबतीत डोळ्यावर पट्टी ओढत असल्याचे दिसत आहे.
जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेला विषय अन्न व औषध प्रशासानकडे मांडला असता. नियम मोडून वर्तमानपत्रातून खाद्य पदार्थांची विक्री करत असेल, तर याविरोधात लवकरच मोहीम उघडण्यात येईल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशानाचे सहायक आयुक्त एम.आर. घोसळवाड यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. तसेच कृषीवलने सामाजिक जाणीवेतून हा प्रश्न मांडल्यामुळे त्याचेही स्वागत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अन्न सुरक्षा व मानके कायदा हा 5 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाची आहे. मात्र हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेत्यांकडून या नियमाला फाटा देण्यात येत आहे. नियमानुसार वर्तमानपत्राचा यासाठी वापर करता येत नाही. तरीदेखील वर्तमानपत्राचा वापर सातत्याने होत आहे. वृत्तपत्र छापताना ज्या प्रकारच्या शाईचा उपयोग केला जातो, त्यात हानिकारक रसायन असतात. हे रसायन इतके हानिकारक असतात की, त्यामुळे कॅन्सरसारखा आजारही उद्भवू शकतो.
वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानेदेखील अनेकदा पेपरमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे.
पेपरवर असलेली शाई अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात जाते, म्हणजे एकप्रकारे केमिकलच आपल्या पोटात जाते. त्यामुळे पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते. या केमिकलचा हार्मोन्सवरही परिणाम होऊ शकतो. पेपरमध्ये ठेवलेले तेलकट पदार्थ खाणे तर अधिक धोकादायक आहे. खाद्यपदार्थाला चिटकून जे हानिकारक केमिकल पोटात जातात, त्यामुळे मुत्राशय, फुफ्फुसांचा कर्करोगही होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे वर्तमानपत्रात गुंडाळलेले कोणतेही खाद्यपदार्थ, पेपरमधील अतिशय तेलकट पदार्थ खाणे टाळा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने यांनी सांगितले.
कृषीवलचे स्वागत
जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेला विषय अन्न व औषध प्रशासानकडे मांडला असता. नियम मोडून वर्तमानपत्रातून खाद्य पदार्थांची विक्री करत असेल, तर याविरोधात लवकरच मोहीम उघडण्यात येईल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशानाचे सहायक आयुक्त एम.आर. घोसळवाड यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. तसेच कृषीवलने सामाजिक जाणीवेतून हा प्रश्न मांडल्यामुळे त्याचेही स्वागत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.