स्वीस कंपनीविरोधात खटला
। यवतमाळ । प्रतिनिधी ।
राज्य किंवा केंद्र सरकारलादेखील सहजासहजी शक्य होणार नाही, अशी कामगिरी महाराष्ट्रातील तिघा शेतकर्यांनी करून दाखवली आहे. 23 शेतकर्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या स्वित्झर्लंड कंपनीला यवतमाळमधील तिघा शेतकर्यांनी तेथील न्यायालयात खेचले असून त्यांच्या या लढ्याला मोठे यश आले आहे.
सिंजेंटा एग्रोकेमिकल कंपनीच्या किटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळमधील हजारो शेतकर्यांना विषबाधा झाली होती. त्यापैकी 23 शेतकर्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर येथील तिघा शेतकर्यांनी कंपनीच्या विरोधात न्यायालयात नुकसान भरपाईची मागणी केली. 2021 मध्ये सिंजेंटा कंपनीविरोधात स्विस न्यायालयात शेतकर्यांनी याचिका दाखल केली होती. यासंदर्भात तेथील न्यायालयाने शेतकर्यांना कायदेशीर मदत देणार असल्याचे सांगितले आहे.
याचिकेत शेतात वापरण्यात आलेल्या किटकनाशकाच्या फवारणीवेळी विषबाधेमुळे शेतकर्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. ही याचिका स्वित्झर्लंडमधील बासेलच्या सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
2017 साली कापसासाठी फवारण्यात आलेल्या किटकनाशकामुळे हजारो शेतकर्यांना विषबाधा झाली होती. यात 23 जणांनी जीव गमावला. यासाठी कंपनीला जबाबदार ठरविण्यात आले आणि खटला दाखल करण्यात आला होता.