वनविभागाकडून 111 ठिकाणी सर्वेक्षण
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई शहरातील कांदळवनावर राडारोडयाचा भराव टाकून तसेच अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वनविभागाने आता कंदवळण क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून अधिकार्यांनी जागांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आधीचे 51 आणि आता 46 असे एकूण 111 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यवनीत करण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
दिवसेंदिवस जमिनीचे भाव वधारत आहेत. त्यामुळे काही असामाजिक घटकांकडून खाडीतील कांदळणवनावर अतिक्रम करून त्याचा अयोग्य वापर करण्याचे सत्र सुरू असून जैवविविधता नष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण टाळण्यासाठी, अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी शासनाने कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निंर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी घेण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात 106 संवेदनशील ठिकाणी एकूण 279 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
यासाठीची 35 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसर्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसर्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे. त्यासाठी वन विभागाकडून कॅमेरे बसवण्याबाबत जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात 111 ठिकाणी निश्चित करण्यात आली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन संधारण नवी मुंबई सुधीर मांजरे यांनी दिली. त्यामुळे आता नवी मुंबईतील कांदळवन पाणथळ जागा सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहेत.