| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने भरमसाठ प्रमाणात जीएसटी आकारून महाराष्ट्रातून 20 ते 25 लाख कोटी रुपये कमावले, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच, केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झाले आहे, असे ही रोहित पवार म्हणाले.
समाज माध्यमावर पोस्ट करताना रोहित पवार म्हणाले की, आज वृत्तपत्रातल्या या जाहिराती व्यवस्थित बघा. गेली आठ वर्षे किराणा सामान, शार्पनर, वही, पेन यापासून देवाच्या अगरबत्तीपर्यंत, विमा हफ्त्यापासून, औषधे, कपडे-चपला तर शेतीच्या खतांपर्यंत भरमसाठ प्रमाणात जीएसटी आकारून केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात जवळपास 110 लाख कोटीहून अधिकचा गल्ला जमवला आहे. त्यात एकट्या महाराष्ट्रातून 20 ते 25 लाख कोटी रुपयांचा वाटा आहे. गेली आठ वर्षे जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापला आणि आजपासून खिसा कापणे काही प्रमाणात कमी करण्याच्या या निर्णयाला दिवाळी गिफ्ट, जीएसटी बचतीचा शुभारंभ म्हणणारे केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झाले आहे, असेच म्हणावे लागेल. आज देशात सरकारविरोधातल्या वाढत्या असंतोषामुळे केंद्र सरकारला आपल्याच कर्माची फळं भोगायची वेळ जवळ आल्याची चाहूल लागल्याने तसेच शेजारपाजारची परिस्थिती लक्षात आल्याने जीएसटी दरात सुधारणा करण्याची उपरती झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना, सरकारला जाग आली हे महत्वाचे आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन, असे रोहित पवार म्हणाले आहेत.






