माणगावात चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, पोलिसांची दमछाक
। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातच सुट्ट्यांमुळे कोकणात चाकरमानी तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. माणगावात शुक्रवारी सकाळपासूनच महामार्गावर जवळपास चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. हि वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी माणगावमधील जिल्हा वाहतूक शाखेची पुरती दमछाक झाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून माणगावातून हा मार्ग बायपास काढला जाणार असून हा बायपासचा काम मार्गी लागला तर माणगावमधील होणारी वाहतूक कोंडी कमी होईल अशी अशा माणगावकरांना वाटत आहे. यासाठी बायपासचे हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे अशी मागणी माणगावकर करीत आहेत.
माणगाव हे दक्षिण रायगडातील मध्यवर्ती ठिकाण असून येथून दिघी-पुणे राज्य मार्ग, माणगाव-पुणे मार्ग व मुंबई-गोवा महामार्ग तसेच जवळील इंदापूर येथून मुरुड-आगरदांडा मार्ग जात असल्याने या मार्गावरून विशेषतः सुट्टीच्या काळात पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. तसेच गणेशोत्सव व होळी, धुलीवंदन सणासाठी मुंबई येथून चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात येत असतात. त्यामुळे माणगावात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळेही माणगावात नेहमीच वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. महामार्गावरून वाहनांच्या दोन लाईन गेल्यास वाहतूक कोंडीला निश्चितच आळा बसेल. परंतु बेशिस्त वाहन चालक तीन चार लाईन करून दुचाकी स्वारांनाही अडचण निर्माण करतात. अशा परिस्थितीत महामार्गावर तिसरी व चौथी लाईन करून बाहेर पडलेल्या चारचाकी वाहन चालकांवर माणगाव वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच अशा बेशिस्त वाहन चालकांचे प्रत्येकवेळी चांगलेच फावते आहे.