| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गेले काही महिने श्रीवर्धनमध्ये नळाद्वारे होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी रानवली धरणामधून श्रीवर्धन व नजिकच्या काही गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जुन्या पाईप लाईन बदलून त्या जागी लाखो रुपये खर्च करुन नवीन पाईप लाईन टाकण्यात आल्या होत्या. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रही बांधण्यात आले होते. त्याचा मोठा गाजावाजा करून समारंभपूर्वक उद्घाटनही करण्यात आले होते. परंतु, काही महिन्यातच ठिकठिकाणी पाण्याच्या पाईप लाईन फुटायलाही लागल्या आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले असून, नागरिकांना पिण्यासाठी असलेले पाणी खूप कमी पडू लागले आहे.नळपाणी पुरवठा आल्यामुळे श्रीवर्धनमधील अनेक विहिरीही बुजविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नळ हे एकच साधन त्यांच्याजवळ राहिले आहे. त्यामुळे दोन-दोन दिवस पाणी पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची मोठीच गैरसोय होत आहे. या सर्व परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारा एक भला मोठा बोलका बॅनर श्रीवर्धन शहरातील टिळक रोडवर लावण्यात आला आहे.
श्रीवर्धनमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606