| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळजवळील कुंभे येथे उल्हास नदीवरून पाणीउपसा करून ते पाणी माथेरान येथे नेली जाणारी जलवाहिनी फुटली. उन्हाच्या दबावामुळे ती पाईप लाईन फुटली असल्याचे सांगण्यात येत असून, हजारो लीटर पाणी वाया गेले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तब्बल चार तासांनी तेथे अभियंते आणि कर्मचारी पोहोचले, त्यानंतर ती जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, या काळात हजारो लीटर पाणी वाया गेले होते.
माथेरान शहरात पाण्याची साठवण करणारा एकमेव तलाव असून, त्या तलावातील पाण्याची क्षमता लक्षात घेता आणि शहरात येणारे पर्यटकांची दररोजची संख्या लक्षात घेता पिण्याची पाण्याची मुबलक सोय व्हावी यासाठी उल्हास नदी वरून पाणी उचलून माथेरान शहरात आणले जाते. कुंभ येथून वाहणार्या उल्हास नदी पाणी उचलून ते पाईप लाईनद्वारे तब्बल 12 किलोमीटर अंतरावरून माथेरान शहरात आणले जाते. माथेरानला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन ही नेरळ कुंभे येथून येत असताना नेरळ माथेरान घाट रस्त्याच्या बाजूने माथेरानला नेण्यात आली आहे. ही जलवाहिनी नेरळ माथेरान घाट रस्त्याच्या मार्गावर वॉटर पाईप भागात फुटली. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली.
रस्त्याच्या बाजूने ही जलवाहिनी असल्याने तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना त्याबाबत माहिती मिळाली. पाईप लाईन रस्त्याच्या लागत डाव्या बाजूला फुटली होती. त्यामुळे या लाईन तात्पुरती सवरूपामध्ये रबरी कापड बांधून पाण्याची गळती कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे कर्मचार्यांची ती मेहनत वाया जात होती आणि त्यावेळी जलवाहिनी मधून पाणी बाहेर फेकले जात होते. शेवटी रात्री उशिरा जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी जीवन प्राधिकरणकडून अभियंते आणि कर्मचारी यांचा अतिरिक्त स्टाफ बोलावण्यात आला. त्यानंतर तब्बल पाच तासांनी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात प्राधिकरणाला यश आले.