| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील 17 हजार 275 पेक्षा जास्त शिधापत्रिकाधारक असून 32 रेशनची दुकाने आहेत. ग्रामीण भागात 28, तर शहरात 4 रेशनची दुकाने असून या शिधापत्रिकाधारकांना केंद्र सरकार मार्फत दर महिना प्रति व्यक्तीस तांदुळ चार किलो तर गहू एक किलो धान्य मोफत ऑनलाईन पॉझ मशीनव्दारे मिळत असते. आज अर्धा महिना होऊन गेला तरी रेशन दुकानात धान्य न आल्याने शेकडो लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याची वेळ ओढवल्याने लाभार्थीनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळीचा शिधा मिळाला पण धान्य कुठे अटकला? असा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत.
शिधापत्रिकाधारक अशोक मोरे (72) भंडारवाडा यांनी आपली नाराजी व्यक्त करत म्हणाले की, धान्य घेण्याकरिता दररोज दुकानात जाऊन खाली हाताने परतावे लागत आहे. तरी शासनाने आमच्या वयाचा विचार करुन आम्हाला पहिल्या आठवड्यातच धान्य द्यावे. त्यामुळे धान्यासाठी आम्हाला पुन्हा-पुन्हा चकरा माराव्या लागणार नाहीत.
नगरपरिषद हद्दीमधील रेशनदुकान धारकांना नवी मुंबई कळंबोळीतून थेट धान्य त्यांच्या दुकानात येत असते. आम्ही फक्त परमिट पाठवून देतो. बाकी ते पाहत असतात. तरी पण आम्ही दोन दिवसात धान्य कसे मिळेल याचा प्रयत्न करु.
सचिन राजे, मुरुड पुरवठा विभाग