। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे सरपंच, ग्रामसेवक आणि अभियंतांवर गुन्हे दाखल करून जलजीवन मिशनमधील मंजूर योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यासह इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यासह लाडीवलीतील महिला व आदिवासी बांधव पनवेल उपविभागीय कार्यालयासमोर बुधवार दि.18 मे रोजी उपोषणास बसले होते. मात्र अधिकार्यांच्या आश्वासनामुळे सध्या उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
दूषित पाणी पुरवठा करणार्या दोषी गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि पाणी पुरवठा अभियंत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, गुळसुंदे ग्राम पंचायतीसाठी मजल जीवन मिशनफ मधून 1 कोटी 19 लाख रुपयांच्या मंजूर योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, एम.आय. डी.सी.चे थकीत पाणी बिल न भरणार्या ग्राम पंचायत तुराडे व वावेघर यांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात यावा, गुळसुंदे ग्राम पंचायतीमधून लाडीवली गाव, आदिवासी वाडी, लोना कॉलनी ही स्वतंत्र ग्राम पंचायत करण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी. या विशेष मागण्यांसाठी उपोषणाला बसल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले.
मात्र पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोय, रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुनील मिटकरी विस्तार अधिकारी घरत यांनी उपोषणस्थळी येऊन पुढील दहा दिवसात जलजीवन मिशनमधील मंजूर झालेल्या एक कोटी 19 लाखाच्या योजनेचे काम सुरू करणार एमआयडीसीच्या थकबाकी पोटी 45 लाख रुपये दोन दिवसात भरून या योजनेचा उद्धव घेऊन सदर योजना कार्यान्वित करण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यावर सदर उपोषण पुढील पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.