। उरण । वार्ताहर ।
चिरनेर गावातील निसर्गरम्य अक्कादेवी धरण सध्या पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक कुटुंबासह या परिसराचा आनंद लुटण्यासाठी येतात. अशा पर्यटकांकडून परिसरात टाकण्यात येणारा कचरा उचलण्याचे काम चिरनेर गावातील अभिनव मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. 22) हाती घेण्यात आले. अभिनव मित्र मंडळाच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. चिरनेर गावातील अभिनव मित्र मंडळाचे पदाधिकारी हे मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच पद्माकर फोफेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 30 वर्षे परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. या मंडळाच्या पदाधिकार्यांनी, सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळामध्ये नागरिकांना मोलाचे सहकार्य केले. या कार्याची दखल घेऊन अभिनव मित्र मंडळाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचे औचित्य साधून चिरनेर ग्रामपंचायत व घंटागाडी कर्मचारी महेश चिरनेरकर यांच्या सहकार्याने अभिनव मित्र मंडळाचे संस्थापक चिरनेर चे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, अध्यक्ष सुनील नारंगीकर, उपाध्यक्ष विकास म्हात्रे, सदस्य जीवन नारंगीकर, प्रवीण म्हात्रे, विश्वजीत म्हात्रे, किरण नारंगीकर, रोशन मोकल, रवींद्र भगत, गणेश म्हात्रे, संतोष भगत, विश्वास मोकल, कल्लू सिंग, राजेंद्र भगत, यतीन फोफेरकर, आयुष नारंगीकर, स्वरूप म्हात्रे, कौशल मोकल, दर्पण भगत, आश्वेत भगत, संकल्प भगत, मिहीर म्हात्रे यांनी अक्कादेवी धरण परिसरातील कचरा गोळा करून घंटागाडीत भरुन दूर फेकून परिसर स्वच्छ केला.