| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
माजी आमदार दत्तूशेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल यांच्यातर्फे 25 एप्रिल रोजी बाजार समिती आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी येथील परिसर स्वच्छ करण्यात आला.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पनवेल बाजार समिती परिसर स्वच्छ करण्यात आला.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणाहून व्यापारी, शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. अनेक नागरिक ते खरेदी करण्यासाठी येतात. यादरम्यान भाजीपाल्याचा कचरा त्या ठिकाणी साचतो. स्वच्छ बाजार आवार अभियानाच्या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव, संचालक मंडळ यांनी हातात झाडू घेऊन येथील परिसर स्वच्छ केला. यावेळी सभापती नारायणशेठ घरत, उपसभापती सुनील सोनावळे, सचिव प्रकाश नाईक, संचालक बाळकृष्ण पाटील, सुभाष पाटील, अशोक गायकर, अर्जुन गायकर, देवेंद्र मढवी, देवेंद्र पाटील, मच्छिंद्रनाथ पाटील, महादू पाटील, सखाराम पाटील, ललिता फडके, प्रताप हातमोडे, रामचंद्र पाटील, सोमनाथ म्हात्रे, दिनेश महाडिक, अतिश पाटील, यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी उपस्थित होते.