ऐतिहासिक घारापुरी बेटावर स्वच्छता अभियान

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात अरबी समुद्रात वसलेले ऐतिहासिक घारापुरी बेट येथे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने समुद्रकिनारा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. वनशक्ती, सागरशक्ती महाराष्ट्र वनविभाग कांदळवन कक्ष, दिवाले गाव ग्रामस्थ, गव्हाण कोळीवाडा ग्रामस्थ व शेवा कोळीवाडा तसेच स्थानिक मच्छीमार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

या स्वच्छता मोहिमेत सुमारे 50 स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान बेटावरील किनाऱ्यालगत साचलेला सुमारे 3500 ते 4000 किलोपर्यंत अविघटनशील कचरा गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला. समुद्रातून वाहत येणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल, काचेच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे बेटाचे पर्यावरण आणि सौंदर्य धोक्यात येत असल्याने या स्वच्छता मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या उपक्रमात स्थानिक मच्छीमार देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रात साचणारा प्लास्टिक आणि घनकचरा यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात कचरा अडकतो, मासळीचे प्रमाण कमी होते तसेच बोटींच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे समुद्रातील कचरा हा स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणारा गंभीर प्रश्न बनला आहे. स्वच्छता मोहिमेमुळे या समस्येबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

घारापुरी बेट हे युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध एलिफंटा लेण्यांमधील पाषाणशिल्पे इ.स.च्या 9 व्या ते 13 व्या शतकातील अद्वितीय शिल्पकलेचे दर्शन घडवतात. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

– सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष

घारापुरीसारख्या ऐतिहासिक आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या बेटावर स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि स्वयंसेवकांमध्ये पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढण्यास मदत होते.

– कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी

समुद्रातून वाहत येणारा प्लास्टिक कचरा हा किनारी परिसंस्थेसाठी मोठे आव्हान आहे. अशा स्वच्छता मोहिमांमुळे समुद्रकिनारी परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत होते आणि स्थानिक मच्छीमारांनाही याचा थेट फायदा होतो.

– नंदकुमार पवार, प्रकल्प समन्वयक, सागरशक्ती

Exit mobile version