राज्यभर थंडीचा कडाका

मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबई | वृत्तसंस्था |
उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणार्‍या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत यंदा थंडीच्या हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत 13.2 अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.
स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात 13.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात मुंबईतील पारा हा 5 अंशांनी घसरला आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुढील किमान आठवडाभर तरी मुंबई आणि उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता कायम असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Exit mobile version