रायगडात थंडीचा कडाका; जागोजागी पेटल्या शेकोट्या

। अलिबाग । वार्ताहर ।
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा आला आहे. सकाळी आणि रात्री बोचणारी थंडी आता दुपारीदेखील कापरे भरवत असल्याने थंडीपासून संरक्षण करण्याठी गरम कपडे घालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्याचप्रमाणे थंडीपासून दिलासा मिळावा, यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीची मज्जा लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकही दाखल झाले आहेत.

राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची लाट आल्याने त्याचा तडाखा रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, माथेरान-कर्जत, महाड, पोलादपूर, रोहे, श्रीवर्धन, म्हसळा, तळा यांच्यासह अन्य तालुक्यांनाही बसला आहे. सकाळी थंडी अधिक असल्याने धुक्याने शहर आणि गावे चांगलीच नाहून निघत आहेत. सर्वच तालुक्यात तापमानाचा पारा घसरला असून, 15 अंश सेल्सियस इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, आल्हाददायक थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकदेखील दाखल झाले आहेत. नागरिकांनी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कपाटामध्ये ठेवलेले गरम कपडे बाहेर काढले आहेत. ग्रामीण भागामध्ये शेकोटी पेटवून त्याचा आनंद घेण्याचे चित्र आपण सातत्याने पाहतो. यंदा मात्र शहराच्या काही भागांमध्येही शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे दिसत आहे. वाफळणार्‍या चहाचे झुरके मारत नाक्यानाक्यांवर रंगतदार गप्पांनाही चांगलेच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार थंडीचा कडाका असाच काही दिवस राहणार असल्याने आणखी काही दिवस तरी थंडीची चांगलीच मज्जा लुटता येणार आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या दोन दिवसांत तर तापमान 17 अंशांपर्यंत व त्याहून खाली आल्याने बोचर्‍या थंडीचा कडाका सर्वत्र पडला असून, संपूर्ण जिल्हा गारठला आहे. वाढीस लागलेल्या या थंडीचा सामना करताना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी गोष्टींची अचानक गरज भासू लागली असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरू आहे. भल्या पहाटे औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीसाठी जाणार्‍या कामगारवर्गाची कडाक्याच्या थंडीत त्रेधातिरपिट उडत आहे. थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा हा कडाका आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

आगरदांडा परिसरात थंडीची प्रचंड लाट सुरू आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून गार वारे सुरू झाल्याने अंगात स्वेटर व कानटोपी घालावी लागत आहे. सध्या वालाची शेतीचा हंगाम सुरूझाल्याने गारवा अधिक प्रमाणात जाणवत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने लोक उशिरा कामावर जात असल्याचे चित्र दिसत आहे. उबदार कपडे घेण्यासाठी मुरुड बाजारपेठेत लगबग आहे. कोकणातील पर्यटनस्थळ आणि समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गर्दी आहे. वातावरणात गारवा आणि रम्य उबदारपणा आल्याने पर्यटक खूप खूश आहेत. पर्यटनप्रेमी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवरून मोठ्या संख्येने येताना दिसून येत आहे. मुरुडमध्ये सध्या मस्त गुलाबी थंडीचा मोसम असून, तापमानाचा पारा 15.5 से. इतका खाली घसरल्यामुळे सर्वच ठिकाणी धुक्याची चादर पाहावयास मिळाली.

गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने बाजारपेठेतील व्यवहार सकाळी 10 नंतरच सुरू होताना दिसत आहेत. सायंकाळी 7.30 लाच बाजारपेठेत शुकशुकाट जाणवू लागला आहे. थंडीने स्थानिक नागरिक सकाळी घराबाहेर उशिरा पडताना दिसत आहेत.पहाटे मोकळ्या हवेत फिरायला जाणाजयांची संख्या घटली आहे. थंडीने मात्र स्थानिक फुलांचा भाव वधारलेला दिसत आहे. कापड दुकानांमध्ये ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिक दिसत आहेत.थंडीचा जोर वाढत चालल्याने आंबा, काजू बागायतदार सुखावले आहेत.

मागील काही दिवसांपासून जोरदार थंडी जाणवत आहे. त्यामुळे स्वेटर, ब्लँकेट, मफलर, कानटोप्या यासारख्या उबदार कपड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. – वल्लभ धनावडे, रुद्र कलेक्शन, मुरुड

लहरी हवामानाचा नेहमीच आंबा पिकाला बसला आहे. वाढत्या थंडीमुळे उशिरा का होईना, पण आंबा पीक बहरास येणार आहे. थंडीमुळे पोषक वातावरण झाले असून, त्याचा आंबा पिकास चांगला फायदा होईल, अशी आशा आहे. – सुनील घरत, आंबा व्यावसायिक, चौल

Exit mobile version