नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा
| अलिबाग | प्रतिनिधी |
शहाबाज ग्रामपंचयायत निवडणूक प्रभावी झाली आहे. चांगल्या मतांनी सदस्य निवडून आले आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे. शहाबाज एक सुसंस्कृत गाव आहे. ही परंपरा कायम टीकवून ठेवण्यासाठी अधिक चांगल्या पध्दतीने काम करणे गरजेचे आहे. या ठिकाणी अनेक सोयीसुविधा राबवून गावांतील सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी काम केले पाहिजे. शहाबाजच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार म्हणून कटिबध्द आहे, असे प्रतिपादन शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी केले. शहाबाज ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी (दि.17) आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आ. जयंत पाटील पुढे म्हणाले, शहाबाज गावाशी पाटील कुटूंबियांचे एक वेगळे जिव्हाळ्याचे नाते आहे. तो जिव्हाळा आजही कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शहाबाजकरांसह घसवड व अन्य गावांतील ग्रामस्थांनी चांगले काम केले. खारेपाट वीस वर्षांनी होणारी मुंबई आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. स्थानिकांचे महत्व कायम राहिले पाहिजे या भुमिकेतून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. शिक्षणासाठी लागणारे दाखले घरपोच मिळाले पाहिजेत. चांगल्या सुविधा जनतेच्या हितासाठी कशा उपलब्ध होतील याकडे लक्ष देऊन सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. सरपंच उच्च शिक्षीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्यांनी त्या पध्दतीने काम करावे, असे आवाहन यावेळी आ. जयंत पाटील यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खारेपाटात येत होते. या ठिकाणीदेखील त्यांनी संविधानाची अनेक पाने लिहीली आहेत. कसेल त्याची जमीन हा कायदा मंजूर झाला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकीली केली आहे. हे कदापी विसरता कामा नये. देशात, राज्यात एक वेगळ्या तऱ्हेचे राजकारण सुरु आहे. संविधान बदलण्याची तयारी सुरु आहे. मात्र संविधान वाचविण्याबरोबरच शेतकरी, गरीब, कष्टकरी, कामगार व जनतेच्या हितासाठी इंडिया आघाडी म्हणून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढलो आणि जिंकूनही आलो, असे आ. जयंत पाटील म्हणाले.
यावेळी माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, उध्दव ठाकरे गटातील शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, काँग्रेसचे सूनील पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, यतीन घरत, ॲड. मनोज धुमाळ, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती बाळू पाटील, सतीश तरे, नरेश म्हात्रे, नवनिर्वाचित सरपंच केतकी तरे, उपसरपंच भूपेंद्र पाटील, सदस्य संदेश बैकर, सनील पाटील, प्रवीण पाटील, समीर भोईर, सोनल म्हात्रे, स्वाती जुईकर, अश्विनी पाटील, संगीता म्हात्रे, अश्विनी अशोक पाटील, रुचिता चोरगे आदींसह इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.