। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे वेतन गेले पाच महिने रखडले आहे. नोव्हेंबर 2024 पासून वेतनापासून वंचित असून त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस कामाचा बोजा वाढत असून प्रशासकीय पातळीवरून कामासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक कोंडीसह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 832 ग्रामपंचायतींमध्ये 135 पुरुष तर 277 असे एकूण 412 संगणक परिचालक आहेत. बहुसंख्य संगणक प्रचालक या महिला आहेत. मात्र, त्यांचे वेतन अनेक महिने थकविले गेल्याने त्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.