वाढत्या रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण; साथ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरासह तालुक्यामध्ये कावीळने थैमान घातले आहे. दिवसाकाठी साधारणतः 50 ते 75 रूग्ण आढळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे सरकारी दवाखान्यामध्ये कावीळसाठी उपाययोजना अपुर्या पडत असल्याने साथ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहेत.
गेल्याच आठवड्यात आरोग्य खात्याकडून तपासणी केल्यानंतर प्रदूषित पाण्यामुळे काविळचे रूग्ण वाढत असल्याचे समोर आले. त्याचबरोबर पेण शहरात बाजारहाट करणार्या रूग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळले. पेण शहरात जो पाणीपुरवठा केला जातो, तो भोगावती नदीमधून केला जातो. ते पाणी निर्जंतुकीकरण केले जाते, मग पेण शहराकडे येणार्या नागरिकांमध्ये काविळच्या विषाणूंचा प्रादूर्भाव का आढळतोय. याबाबत आरोग्य विभागाने तपासणी केल्यावर एक भयाण सत्य समोर आलेय, तो म्हणजे रस्त्यावर उभ्या असणार्या हातगाड्यांवरील शीतपेय.
एकीकडे सूर्य आग ओकत आहे. तापमानाने 42 अंश पार केले आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे लग्नात येणार्या वर्हाड्यांना थंडपेयाबरोबर थंड पाणी द्यावे, अशी अपेक्षा वधू-वर पक्षाची असते. त्यामुळे पेण तालुक्यात कळत-नकळत बर्फाचा तुटवडा भासू लागला आहे. कारण, पूर्ण पेण तालुक्यात एकच बर्फ निर्माण करण्याचा कारखाना आहे. त्यामुळे बर्फ पुरविणे त्या कारखान्याला शक्य होत नाही. तेथून सर्रास खाण्यायोग्य नसणार्या बर्फाची विक्री होत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. हा बर्फ शहरात आणि शहराच्या बाहेर उभे असणार्या शीतपेयाच्या गाड्यांवर वापरला जात आहे. हा बर्फ अशुद्ध पाण्याने तयार करत असल्याने सर्रास या शीतपेयातून काविळसारख्या साथीच्या आजाराने पेण तालुक्यात थैमान घातले आहे, अशी चर्चा आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, खाण्यासाठी आईसक्यूबचा वापर करणे गरजेचे असते; परंतु आईसक्यूब हा कच्च्या बर्फापेक्षा महागडा असल्याने रस्त्यावरील शीतपेय विक्रेते आईसक्यूबचा वापर करत नाहीत. कमी पैशाने मिळणार्या कच्च्या बर्फाचाच वापर करतात. पूर्वी कच्च्या बर्फाला आकाशी कलर असायचा, त्यामुळे तो कच्चा बर्फ आहे असे सहज समजायचे. परंतु, आता पैसे कमवायच्या हव्यासापोटी बर्फ कारखानदारदेखील कच्च्या बर्फाला आकाशी कलर देत नाहीत. याचाच फायदा शीतपेय विक्रेते घेतात आणि कच्चा बर्फच शीतपेयामध्ये वापरतात. आणि, या शीतपेयामार्फत काविळचा प्रादूर्भाव ग्रामीण भागामध्ये होत आहे. बर्फनिर्मितीवर अन्न आणि औषध प्रशासनाचे लक्ष हवेय; परंतु अन्न व औषध प्रशासन कर्मचारी कमी असल्याची सबब सांगत याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच बर्फ कारखानदारांचेही फावत आहे.
कार्यालयात कर्मचार्यांची कमतरता असल्याने आम्ही बर्फ बनवणार्या कारखान्याची तपासणी करू शकत नाहीत. हे मान्य करतो; परंतु शुद्ध पाण्यापासून बनवलेला बर्फच वापरावा. तसेच बर्फ शुद्ध पाण्यापासून बनवणे बंधनकारक आहे.
मारुती घोसळवाड,
सहायक आयुक्त,
अन्न आणि औषध प्रशासक, रायगड