पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
कागदपत्रे देणारे कोण? मदत करणाऱ्या तरुणांचीही चौकशी होणार का?
| रायगड/पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात एका महिलेच्या तक्रारीनंतर समोर आलेल्या कथित बांगलादेशी महिलेच्या प्रकरणाने आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित महिलेला विशेष पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिचे नाव मन्नत निजाम अन्सारी असल्याचे समोर आले असून, ती बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना सर्वात मोठा प्रश्न मात्र तिच्या हातात असलेल्या भारतीय शाळेच्या दाखल्यावरून निर्माण झाला आहे.
31 जुलै रोजी निशा गोडिवले यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यावेळी या तक्रारीची अपेक्षित गांभीर्याने दखल घेण्यात आली का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित महिलेने पोलिसांकडे आजमगड येथील शाळेचा दाखला सादर केला होता. या दाखल्यावर तिची जन्मतारीख 11 डिसेंबर 2004, आईचे नाव सलमा आणि वडिलांचे नाव निजाम असल्याचा उल्लेख आहे.
मात्र, या कथित लिव्हिंग सर्टिफिकेटच्या स्वरूपावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दाखल्यावर मुख्याध्यापकांची सही लाल शाईने असल्याचे, तर काही माहिती अपूर्ण असल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा दाखला खरा आहे का? तो कोणत्या शाळेने जारी केला? संबंधित शाळेच्या नोंदवहीत या महिलेची नोंद आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर ती बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर तिला आजमगड येथील शाळेचा दाखला मिळालाच कसा? हे प्रश्न आता तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहेत.
कागदपत्रांच्या मुळापर्यंत पोहोचणार का?
एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर केवळ दाखला स्वीकारून प्रकरण थांबविण्याऐवजी त्या कागदपत्राची सत्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. संबंधित शाळेची प्रवेश नोंद, जन्मनोंद, पालकांची माहिती, दाखला देण्याची प्रक्रिया आणि तो दाखला नेमका कोणी मिळवून दिला, याचा तपास होणे गरजेचे आहे. हा दाखला बनावट असेल तर तो तयार करणारे कोण? खरा असेल तर त्यामागील संपूर्ण नोंद काय? आणि जर एखाद्या परदेशी नागरिकाला भारतीय कागदपत्रे मिळवून देण्यात आली असतील, तर त्यामागे स्थानिक पातळीवर कोणाचे जाळे कार्यरत आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
पेणमधील दोन तरुणांची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी?
या महिलेला पेण शहरातील दोन तरुणांनी मदत केल्याचा आरोपही पुढे येत आहे. त्यामुळे संबंधित तरुणांचा या महिलेशी नेमका संबंध काय होता, तिची ओळख त्यांना कशी झाली, तिच्या कागदपत्रांबाबत त्यांना काय माहिती होती आणि तिला वास्तव्यास अथवा इतर बाबींमध्ये त्यांनी काही मदत केली का, याची पोलिसांनी सखोल चौकशी करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न!
31 जुलै रोजी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची तातडीने आणि सर्वंकष चौकशी झाली होती का? संबंधित महिलेने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी त्याचवेळी का झाली नाही? केवळ एका दाखल्याच्या आधारे तिच्या नागरिकत्वाबाबत पोलिसांनी भूमिका घेतली असेल, तर ती कार्यपद्धती कितपत योग्य होती? पेण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केवळ संबंधित महिलेपुरता मर्यादित न ठेवता कागदपत्रे तयार करणारे, उपलब्ध करून देणारे, स्थानिक पातळीवर मदत करणारे आणि संपूर्ण प्रकरणामागील संभाव्य साखळी यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. आता या महिलेचे नागरिकत्व, तिच्या कागदपत्रांची सत्यता आणि तिला मदत करणाऱ्या व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होते का, याकडे पेणकरांचे लक्ष लागले आहे.
