जंगलालगतच्या पाच आश्रमशाळांची तातडीने सुरक्षा तपासणीची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील जंगलालगत असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे आणि तालुक्यातील सर्व आश्रमशाळांची तातडीने सुरक्षा तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे.
कर्जत तालुक्याचा मोठा भाग आदिवासीबहुल असून, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासनाने विविध ठिकाणी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. तालुक्यात चाफेवाडी, पाथरज डोंगरपाडा, भक्ताचीवाडी-पिंगळस आणि भालिवडी येथे चार शासकीय आदिवासी आश्रमशाळा असून, माणगाववाडी येथे विनाअनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे. या सर्व आश्रमशाळा जंगल परिसरालगत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
पावसाळ्यात आश्रमशाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झाडी-झुडपे वाढली आहेत. त्यातच चाफेवाडी आणि भक्ताचीवाडी-पिंगळस येथील आश्रमशाळा नदीलगत असल्याने साप, विंचू तसेच अन्य विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासाच्या इमारती, परिसरातील स्वच्छता, रात्रीची सुरक्षा, वीजव्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळण्याची व्यवस्था यांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे.
आश्रमशाळांमध्ये राहणारे विद्यार्थी हे आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांमधून आलेले आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कुचराई झाली आणि एखादी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने धावपळ करण्यापेक्षा ती घडूच नये यासाठी आधीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील सर्व आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, इमारतींची अवस्था, परिसरातील झाडी-झुडपे, स्वच्छता, रात्रीची सुरक्षा व्यवस्था आणि विषारी प्राण्यांपासून संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्याध्यापक, अधीक्षकांच्या कामाचेही ‘सुरक्षा ऑडिट’ व्हावे
यापुढे केवळ कागदोपत्री पाहणी करून चालणार नाही. आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष आणि नियमित ऑडिट करावे. मुख्याध्यापक व अधीक्षक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडतात की नाही, याचीही चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे कर्जत शहर उपप्रमुख कृष्णा जाधव यांनी केली आहे.
गडचिरोलीतील घटनेची पुनरावृत्ती कर्जत तालुक्यात होऊ नये, यासाठी शासनाने सर्व आश्रमशाळांचे सुरक्षा ऑडिट करावे. शाळांचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडतात की नाही, याची तपासणी करावी. जंगल भागात असलेल्या आश्रमशाळांमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा जीव अमूल्य आहे; त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये.
– कृष्णा जाधव






