। रायगड । प्रतिनिधी ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
सहाण एकदंत नगर अलिबाग येथे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बार्बर-न्हावी (असिस्टंट हेअर ड्रेसर) या पहिल्या व जेएसएसच्या पाचव्या बॅचचे उद्घाटन सहाण अलिबाग रायगड येथे संपन्न झाले. सदर योजनेत देश भरातील 1000 पेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकर्माना 2028 पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गांमध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता 4 हजार रुपयांबरोबरच, मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र, प्रत्येकी 15 हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाउचर्स बरोबरच कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासह 5 टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंतची टप्प्याटप्प्याने कर्ज सुविधादेखील प्रशिक्षणार्थींना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे यांनी व्यक्त केले. जे.एस.एस रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नाव नोंदणी करावी असे उद्गार कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संचालक सदस्य नरेन जाधव यांनी व्यक्त केले. तर जेएसएस रायगड व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात आत्मनिर्भर भारतसाठी पुढाकार घेत आहे असे मत अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ.नितीन गांधी, नरेन जाधव, संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांच्या समवेत प्रतिक्षा चव्हाण, प्रशिक्षक रिद्धी पाटील, अस्मिता भोईर आदी मान्यवर आणि प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.