पालीमध्ये समन्वय समितीची बैठक

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुका समन्वय समितीची बैठक सोमवारी (दि.15) तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षेत पार पडली. या बैठकीत अंबा नदी प्रदूषण, कंपन्यांमधील अनधिकृत बांधकामे, जलजीवन मिशन योजनांची कामे अशा अनेक महत्वाच्या विषयांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील काही केमिकल कंपन्यामधील रसायनयुक्त सांडपाणी कंपनीच्या मागील बाजूस असणार्‍या अंबा नदीत सोडले जाते. तसेच, येथील काही कंपन्यांमध्ये परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे केली जात असल्याचा आरोप रासळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नरेश खाडे यांनी समन्वय समितीच्या बैठकीत केला. यावर समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, हा अतिशय गंभीर असून तहसीलदार यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन संबंधित विभागाकडून कंपन्यांना नोटीस देण्यात याव्यात.

सुधागड तालुक्यात होत असणार्‍या जल जीवन मिशनच्या कामाकडे समन्वय समितीचे सदस्य अरविंद फणसे यांनी लक्ष वेधले. काही ठिकाणच्या विहिरींना पाणीच लागलेले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी याचा इन्कार केला. यावर अध्यक्षांनी या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील महिलांना फायदा मिळवून देण्यासाठी कॅम्प घेऊन त्यांना दाखल्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी अध्यक्ष कुलकर्णी यांनी तहसीलदारांकडे केली. समन्वय समितीच्या बैठकीस काही शासकीय अधिकार्‍यांनी दांडी मारली. यामुळे महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीच्या विविध शासन योजना आणि उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असल्याची खंत सुधागड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या बैठकीला तहसीलदार उत्तम कुंभार, नायव तहसीलदार भारत फुलपगारे, नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर अडसुळे, समन्वय समितीचे सदस्य संजय म्हात्रे, संदीप दपके, अमोल कांबळे, अरविंद फणसे, गणेश शिंदे आदींसह सदस्य विविध शासकीय विभागाचे अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version