अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यात धुमाकूळ घेतला होता. अनेक ठिकाणी महापूर आला होता तर दरडी कोसळण्याच्या रस्ते खचण्याचे प्रकार घडले होते. या संकटातून सावरत असताना हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 30 जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती हवामान विभागाने दिली असून रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान महिनाअखेरला रायगड, रत्नागिरीत पावसाचा जोर वाढणार असून तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. काही जिल्ह्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेकांना आपली जिवाभावाची माणसं गमवावी लागली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून पाणी ओसरत आहे. त्याचबरोबर विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे. मात्र हवामान विभागाने पूरग्रस्त जिल्ह्यात महिनाअखेरीपर्यंत पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (27 जुलै) आणि उद्या (28 जुलै) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
29 आणि 30 जुलैला रोजी ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून 29 आणि 30 जुलैला अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभाग नेहमी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टचा इशारा देत असत. परंतु याचा नेमका काय अर्थ असतो हे जाणून घेऊ…
ग्रीन अलर्ट
कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.
यलो अलर्ट
हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवसांमध्ये संकट ओढवू शकते, अशी सूचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्टचा इशारा दिला जातो.
ऑरेंज अलर्ट
कोणत्याही क्षणी उदभवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीच्या उद्देशाने प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. गरज असेल आणि महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितलं जातं.
रेड अलर्ट
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.