पावसाचे 35 बळी, अनेक गावांचा संपर्क तुटला
20 लाख हेक्टरचे नुकसान, 4000 जनावरे वाहून गेली
मुंबई | वृत्तसंस्था |
मराठवाड्यात मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे अक्षरश: अस्मानी संकट कोसळले. गेल्या अनेक वर्षात झाला नाही असा पाऊस कोसळल्याने विभागातील आठही जिल्ह्यात शेतांचे अक्षरश: तळे झाले आहे. जोरदार पावसामुळे जलसाठे ओव्हरफ्लो झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते, पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली. तसेच तलाव, धरणे ओव्हर फ्लो झाल्याने व नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात अनेक जण घरांवर अडकल्याची घटना घडली आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली. मालमत्तांच्या नुकसानीसोबतच मराठवाड्यातील शेतमालांवर ओल्या दुष्काळाने घाला घातला आहे. चार जिल्ह्यांसह तब्बल 182 मंडळात अतिवृष्टीची, तर विभागात 61.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
विभागात सोमवारी मध्यरात्री 12.45 वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सलग सात तास कोसळत राहिला आहे. त्यामुळे विभागातील बहुतांश मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.
बळीराजा संकटात
शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामाचे पीक पूर्णत: वाहून गेले आहे. तर अनेक शेतांमध्ये तळे साचल्याने मका, कापूस, मूग, उडीद, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. आतापर्यंत 20 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे.
गावांना पाण्याचा वेढा
औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर या सात जिल्ह्यात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. विभागातील 421 पैकी तब्बल 182 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने अनेक गावांना पाण्याचा वेडा पडला आहे. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून, अनेक घरोच्या छतावर अडकले आहे. त्यांच्या बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
शेकडो घरे पाण्यात
विभागातील 182 मंडळांत अतिवृष्टी झाल्याने त्या ठिकाणचे शेकडे घरे पाण्यात आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मध्यरात्री सुरू झालेला हा पाऊस सकाळी उशिरापर्यंत अनेक मंडळात सुरूच होता. त्यामुळे पाणी ओसरून जाण्याच्या प्रतीक्षेत नागरिकांना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला.
घरांची पडघड, जनावरे गेली वाहून
विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर अनेकांची लहानमोठी जनावरे पावसाच्या पूरात वाहून गेली आहे. तर काहींची जनावरे मरण पावली आहेत.
64 मंडळात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस
मराठवाड्यातील 182 मंडळात अतिवृष्टी झाली असून, त्यातील 64 मंडळामध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर, कजेमधील उसूफ मंडळात तब्बल 211 मि.मी. आणि होळमध्ये 208 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आदेश दिले असून, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री
अतिवृष्टीची शक्यता
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील 48 तासांत गुलाब चक्रीवादळाच्या राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. पुढील 3-4 तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार, काही भागात वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
बस नाल्यात कोसळून दोघांचा मृत्यू
पुसद-उमरखेड रस्त्यावरील दहागाव पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नाल्यात कोसळली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, बस चालकासह काही प्रवासी बेपत्ता झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच उमरखेड तहसीलदार, ठाणेदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने मदत कार्य सुरू केले.